बाबूजी धीरे चलना नही....

 बाबूजी धीरे चलना नही....

          प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असतं असं आपण कायम ऐकत आलोय.त्यामुळे काल परवा  शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे जर निवडणुकीपूर्वी स्वगृही कॉंग्रेस मध्ये आले तर अचंबा वाटावं अस काहीच नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीची लढत रंगतदार आणि "राखीव" अशीच झाली होती.राष्ट्रीयपनात गुरफटलेल्या रामदास आठवलेंचा दोन्ही कॉंग्रेस वाल्यांनी मिळून "गेम" केला.त्यांनी केलेला गेम शेवटपर्यंत सध्या दासाचा "राम" झालेल्या  आठवलेंना कळला नाही.

   


ज्यांनी जय भीम पेक्षा राम राम बरा असा जातीयवादी प्रचार केला,त्यांच्या सोबत आपलं जातीचं कार्ड वापरून वाकचौरे निवडून आले.साधी ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक न लढलेला माणूस सरळ लोकसभेत जाऊन बसलेला सर्व नागरिकांनी पहिला.हा पराभव रामदास आठवलेंच्या जिव्हारी लागण स्वाभाविक होत.पण या सगळ्या घोडेबाजारात आणखी एक नाव होत ते म्हणजे प्रेमानंद रुपवते याचं!!
             २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रुपवते या शिर्डी मतदार संघात सक्रिय तर होतेच,परंतु कॉंग्रेस चे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ख्याती सुद्धा आहे.त्यांचे वडील आद.दादासाहेब रुपवतेंच्या मुशीत वाढलेल्या यांची जडणघडण संपूर्ण काँग्रेसी वातावरणातच झाली.रिपब्लिकन चळवळ फुटण्यासाठी दादासाहेब रुपवतेंना टार्गेट केलं जात.या गोष्टीमध्ये तथ्य जरी असलं तरी, कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्याचं सगळ राजकारण हे आंबेडकरी चळवळीला पुनरुज्जीवन करणारंच होत.दलित-आदिवासी-कष्टकऱ्यांच दुखण समजून घेणारा नेता नगर जिल्ह्यात अजून तरी जन्माला आला नाही अस म्हणायला हरकत नसावी.मंत्रिमंडळात  असताना दादासाहेबांनी केलेलं काम कुणी विसरू शकणार नाही.आणि जे विसरू पाहतील त्यांना कृतघ्न म्हणावं लागेल.त्यांचे विचार घेऊन प्रेमानंद रुपवते महाराष्ट्राच्या राजकारणात सामील झाले.फुले-आंबेडकरी विचारधारेचा तत्वचिंतक नेता म्हणून "बाबूजी" खेडोपाडी परिचित आहेत.त्यांच्या विचारांचा,ओघवत्या शैलीचा,लेखनाचा आणि विनोद बुद्धीचा चाहता वर्ग भरपूर आहे.अशा अष्टपैलू व्यक्तीकडे पाहिलं कि भारतीय राजकारण किती शालीन,कूलीन आणि सुसंस्कृत असू शकत याची प्रचीती येते.
       
            २००९ निवडणुकीत शिर्डीची जागा आघाडी च्या कोट्यातून रामदास आठवलेंना सोडली गेली.हक्काची जागा गेल्यामुळे प्रेमानंद रुपवतेंनी (शमणारी अशी) बंडखोरी केली.त्यांच्या पदरी पडलेली सुमारे २३००० मते काही किमया दाखऊ शकले नाहीत.बंडखोरी केल्यानंतर विचारवंत,अभ्यासू नेता आपल्या हातून निसटू नये म्हणून त्यांना सन्मानाने पक्षात घेतलं गेल.बसप,शिवसेना यांची ऑफर असतानासुद्धा विचारांशी प्रतारणा  करणे त्यांनी अमान्य केल.शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना बाबूजींना आपल्या गोटात सामील करण्यासाठी उत्सुक होती.परंतु तात्त्विक तडजोडीला भिक घालतील ते बाबूजी कुठले? परंतु दरम्यानच्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेल.हरलेले रामदास आठवले शिवसेनेसोबत युती करून खासदार झाले,भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना सोडून निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही कॉंग्रेस मध्ये परतले.अशाही परिस्थिती बाबूजी मात्र कॉंग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिले.त्यांची कन्या उत्कर्षा युवक कॉंग्रेस मध्ये महत्वाची भूमिका बजावते आहे,युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय  सचिवपदी काम करण्याची तिला संधी मिळाली.हि गोष्ट बाजूला ठेवली तर बाबूजींच्या हाती नेमकं लागलं काय? हा प्रश्न तसाच कायम आहे.महाराष्ट्रातील राजकारणात कॉंग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या एकनाथ गायकवाड ,सुशीलकुमार शिंदे(आपल्या पुत्रींसह) यांना पक्षाने सन्मानाने वागणूक दिलेली आहे.मग फक्त प्रेमानंद रुपवातेंना का दुय्यम स्थान दिल जात हे कळत नाही.
             मनात आणलं असत तर रिपब्लिकन रुपवते गट याअगोदरच स्थापन झाला असता.पण  सामान्य नागरिकांची अशी अपेक्षा आहे कि बाबुजींनी , "राजकारण" करून आपली स्वतःची ताकद आजमावली तर हरकत नाही.भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत जाऊन खासदार होऊ शकतात मग रुपवते का नाही?  "विनाशकाले विपरीत बुद्धी" झालेल्या कॉंग्रेस ने भाऊसाहेब वकचौरेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.या निवडणुकीत सुद्धा बाबूजींना डावलली जाण्याची दाट शक्यता आहे.जस अगोदर म्हटलं आहे कि प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असत त्याप्रमाणे वेगळा विचार करायला काहीही हरकत नाही.नवा प्रयोग जरूर करावा.केजरीवाल,मोदींच्या घोडेबाजारात मतदार सुद्धा सर्वसमावेशक अशा वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहेत.बाबूजी धीरे चलना....या गाण्यात गायिका  बाबूजींना(रुपवते नव्हे) हळूहळू चालायला सांगते आहे,परंतु सर्वसामान्य नागरिक मात्र बाबूजींना हळूहळू चलताना सिंहावलोकन करा असा सल्ला देत आहे.आता मात्र हि शेवटची संधी आहे बाबूजी धीरे चलना नही .....अभी नही तो कभी नही...!!

अरे "महानायक" संपादका तुमची यत्ता वाढणार कि नाही????

                रिपब्लिकन चळवळ आणि आंबेडकरी जनता यांचा संबंध हा काय फार नवा नाही. प्रत्येक आंबेडकरी नागरिकाला रिपब्लिकन चळवळीशी असलेली आस्था हि केवळ बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही प्रगल्भ व्हावी ह्या हेतूने आहे.रिपब्लिकन गटातटांची फाटाफूट प्रत्येकजण जाणतो.कधी स्वतःच्या  फायद्यासाठी तर कधी सत्तेच्या हव्यासापोटी स्वतःला "राष्ट्रीय" म्हणविणारे रिपब्लिकन नेते विकले गेलेले आपण पहिले आहेत.आपला "स्वाभिमान" गहाण  ठेवायला सुद्धा यांनी मागेपुढे पहिले नाही.. आजचा तरुण हा आपल नेतृत्व मनसे,शिवसेना आणि कॉंग्रेस इतर पक्षांमध्ये शोधतो आहे.स्वतःची १३-१४% हक्काची मते असतानाही केवळ इतर पक्षांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण त्यांच्या दावणीला बांधलो गेलो आहोत,याची जाणीव आजचा सुशिक्षित आंबेडकरी तरुण मनात बाळगतो आहे.


दलित पँथरच्या उदयासाठी १९७०च्या वेळी जी परिस्थिती होती, नेमकी तशीच परिस्थिती आज आहे. आजचा हा दलित सुशिक्षित तरुण आतल्या आत घुसमटतो आहे.आजवरच्या सर्व रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांनी नवं नेतृत्व जन्माला येऊ नये,म्हणून पद्धतशीरपणे काळजी घेतल्याचे  पदोपदी जाणवते आहे.संस्थापक सदस्य असलेले पँथर आता वेगवेगळ्या तंबूमध्ये विसावलेले आहेत.नामदेव ढसाळ यांच्या रूपाने गरजणारा पँथर आता पडद्याआड गेला ,आणि उरलेसुरलेले सगळे वैयक्तिक स्वार्थासाठी "जोहार" मागत आहेत.असं लाचारीच्या  राजकारणाचा या दलित तरुणांना उबग आलाय.कितीवेळ हि लाचारी सोसायची,असा प्रश्न प्रचंड स्थितीज उर्जा असलेले हे  तरुण मुले इथल्या व्यवस्थेला विचारत आहेत.आणि हि घुसमट व्यक्त  होताना आता कुठे दिसते आहे.या प्रश्नाची उकल करण्यासाठी ह्या मुलांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आणि एक सर्वव्यापी उपाय सुचविला आहे,त्याच निमित्ताने ह्या पत्रकार परीषदेच आयोजन देखील करण्यात आले होते.
    येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व दलित नेत्यांनी आपला मुजोर अहंगंड बाजूला  ठेऊन किमान निवडणूकपूर्व आपापसात युती करावी असा प्रस्ताव या युवकांनी मांडला आहे. रिपब्लिकन पक्षांचे सध्या ५२ गट आहेत.रिपब्लिकन पक्ष आणि फाटाफूट हे समीकरण लोकांच्या सवयीचं झालं.प्रत्येक दिवसाला रिपब्लिकन पक्षाचा एखादा गट निर्माण होत असतो,असे उपहासाने म्हटले सुद्धा जाते.
    आजवर अनेकवेळा रिपब्लिकन ऐक्य व्हावे म्हणू प्रयत्न केले गेले.परंतु एका म्यानात एवढ्या ५२ तलवारी मावणार तरी कशा,त्यामुळे या ऐक्याचं नेतृत्व कुणी करायचं,युती कुणाशी करायची या प्रश्नावरून हे ऐक्य अनेकदा फुटलं.या तथाकथित ५२ राष्ट्रीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मग उपोषणही केले गेले,परंतु प्रतिक्रिया शून्य!
हक्काची १३-१४दलित मते असतानाही केवळ मतांचं ध्रुवीकरण होत असल्यामुळे कुणाच्याही पदरी यश आलेलं नाही.पश्चिम बंगाल मध्येसुद्धा कम्युनिस्ट पक्षांचे असेच कितीतरी गट आहेत.परंतु राजकीय फायद्यासाठी हि कम्युनिस्ट मंडळी निवडणुकीपूर्वी आपापसात युती करतात आणि निवडणुका लढवतात.यामुळे विनाकारण होणारे मतांचे ध्रुवीकरण थांबते आही हक्काची मते त्यांच्या पदरी पडतात.नेमके हे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातही रिपब्लिकन पक्षांनी निवडणूकपूर्व ऐक्य नाही तर किमान युती जरी केली,तरी सत्तेच्या जवळ  ते जाऊ शकतात एवढी ह्या दलित मतांची ताकद आहे.आणि हीच गोष्ट "फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट " हि संघटना वस्त्या-वस्त्यांवर जाऊन पथनाट्य करून लोकांना समजून सांगत आहेत,आणि सह्यांची मोहीम राबवत आहेत.लोकांचाही याला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे.

    फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट ने हाती घेतलेले हे काम बघून राजकीय महत्वकांक्षा असलेले स्वयंघोषित "महानायक" पत्रकार ह्या नवतरुणांना त्यांची यत्ता विचारत आहेत,ह्या नवतरुणांना असा अभ्यासशून्य उपद्व्याप करायला कोणी सांगितला म्हणून आपल्या वर्तमानपत्रात लेखमाला लिहून ते या प्रयोगाला खुजे  ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत.मुळात हे महाशय आंबेडकरी चळवळीत सक्रिय कधी दिसले नाहीत. कोणत्या आंदोलनात नामांतराच्या चळवळीत रिडल्स च्या मोर्चात खैरलांजी हत्याकांड निषेधात! आपली गाडी-माडी आणि पैशाची नाडी  सांभाळणारा हा पत्रकार कधी समोर आलाच नव्हता.आपल बेरकी तत्वज्ञान झाडायला सध्या त्यांनी सुरुवात केली आहे.हे संपादक हि गोष्ट विसरत आहेत कि वृत्तपत्रे हे क्षणिक साहित्य असत आणि अनंत काळाची रद्दी असते.आपले रद्दड विचार कुणी का म्हणून स्वीकारेल? एसी मध्ये बसून चं छान छान लेख लिहायला जास्त कळ सोसावी लागत नाही.वडिलोपार्जित संपत्ती घेऊन अशा लोकांनी परिवर्तनवादी गप्पा कराव्यात हेच मुळात हास्यास्पद वाटतंय.आपली  ओजस्वी आणि तेजस्वी पत्रकारिता वापरून महारकी करणाऱ्या जनावरांसारख राहणाऱ्या समाजाला बाबासाहेबांनी कधी इयत्ता विचारली नव्हती.साधा गावकुसाबाहेर राहणारा प्रत्येक दलित तरुण मनापासून बाबासाहेबांवर आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करतो.आपल्या  कुवतीनुसार तो समाजाला योगदान देत असतो.त्या प्रत्येकाला आपण त्याची  यत्ता विचारणार आहोत का? नामांतरात श्वास संपेपर्यंत "जय भीम" म्हणणाऱ्या पोचीराम कांबळे,गौतम वाघमारे यांना सुद्धा तुम्ही यत्ता विचारणार का?
अरे तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे दुसऱ्यांची यत्ता विचारण्याचा??? असले तत्ववादी लेखमाला लिहून आपली स्वतःची यत्ता कधी वाढत नसते.पूर्वग्रह असलेले विचार तुमच्या यत्तेला अधिकच खुंटीत करतील. आजवरच्या सगळ्या परिवर्तनवादी चालवली इथल्या  सत्तेला बळ देऊन क्षीण झाल्या.बाबासाहेबांचा अस्थिकलश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर "भावनिक" दौरा करून ज्यांनी युती अभियान चळवळ,त्यांनीच मग आपला सावता सुभा "स्वाभिमानीनावाने निर्माण केला.असा सगळा त्यांचे मागे इतिहास असताना दुसऱ्यांच्या प्रयत्नाला कितीवेळ पाण्यात पाहणार आहात आणि आंबेडकरी जनतेला मिंधे बनविणार आहात.

भटकते भटकते मंजिल तक पहुचेंगे सही,
गुमशुदा तो  वो ही जो घरसे निकले हि नही.....

 फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट आपली विचारांची मशाल पेटवत परिवर्तनाची पहाट येईल  अशी अशा बाळगतो आहे,जे घरी बसून पोकळ गप्पा मारातायेत त्यांना येणारा काळच उत्तर देईल.