मुंबईतली वेश्यावस्ती आणि नोटबंदी

                 
'घाल,अंगावर गाडी पोरा.नाहीतरी जगून काय फायदा?  एखादी गाडी यावी आणि आम्हाला चिरडून जाव असं वाटतंय आता'. मुंबई महानगरातील कायम कलंकित समजल्या जाणाऱ्या वस्तीत आम्ही उभे होतो. कामाठीपुरा. वेश्यावस्ती म्हणून प्रसिद्ध असलेला हा मुंबईचाच एक भाग ,येथे देहव्यापार चालतो.वस्तीत शिरल्यावर जिथे आम्ही आमची  दुचाकी लावायला थांबलो ,तिथे साठी ओलांडलेली एक महिला बसलेली होती ,त्या महिलेने आम्हाला हे बोल सुनावले होते. म्हटलं, काय झालं आंटी? एवढ्यात काय मरायचे स्वप्न बघताय? जगा कि पोटभरून. आंटी बोलायला लागल्या,विनाकारण जगण्यात काय मजा? जवानीत असताना भरपूर पैसा कमवला.आता या वयात कोण विचारतंय? पोटात घालायला अन्न नाही.शेजारी गिऱ्हाईकांची वाट बघत उभ्या असलेल्या मुलींकडे बघत म्हणाली, या पोरी देत असतात दिवसाला १०-२० रुपये, तेव्हा जेवण-चहा,नाश्ता याची सोय होत असते. या आंटी हेंद्राबादवरुन ४० वर्षांपूर्वी मुंबईत आल्या. अगोदरच घरच अठराविश्वे दारिद्र्य.तेव्हा झटपट पैसे कमावण्याचा मार्ग म्हणजे वेश्याव्यवसाय. हा काटेरी मार्ग पत्करला आणि उभ्या आयुष्याचं वाळवंट झालं. आज या आंटीच्या मागेपुढे बघणार कुणीही नाही.नातेवाईक काय म्हणून मला संभाळतील असा आंटीचा प्रश्न आहे,तेव्हा लाचारीचं जगणं नातेवाईकांच्या दारात काढण्यापेक्षा,ज्या कामाठीपुऱ्यानं बदनाम केलं,लाचार केलं, तिथेच भीक मागून खाण्यात काय वाईट असं तिचं म्हणणं आहे.


यांचा भूतकाळ,वर्तमानकाळ अंधारात होता,आणि आहे.भविष्याबद्दल माहिती नाही.

 ५००-१००० च्या नोटबंदी बद्दल विचारलं तर आंटी सांगते, कि पैशाची बचत कधी केलीच नाही.आलेला पैसे कायम मौजमस्तीत घालवला. म्हातारपणी आधार होईल म्हणून पैसे साठवले नाहीत.जनधन योजनेत बँक अकाउंट काढलं खरं,पण त्यात टाकायला पैसे कुठे आहेत? अगोदरच हलाखीचं जीवन जगत होतो,आता त्यात अजून भर पडलीये.

***
२.

आंटीसोबत गप्पा झाल्यावर वस्तीमध्ये शिरलो. पुण्याच्या बुधवार पेठेत एकदा गेलो होतो.पुण्याची ही वेश्यावस्ती त्यामानाने अधिक फुललेली वाटली होती. वेश्यावस्ती फुललेली असणं म्हणजे समाजाचं बदफैली असणं आहे. बदफैली असं म्हणजे तरी काय? या वेश्यासमाजाला बिघडवतात काय? कि बिघडलेला समाज यांना असा दूर अंधारात लोटतो? ही शोषणाची प्रक्रिया दोन्ही बाजूने चालते कि एकाच बाजूने अव्याहत सुरु आहे? या सगळ्या प्रक्रियेचा लगाम कुणाचा हातात आहे? याच मूळ शोधायला वेळ आहे का आपल्याकडे ? या सगळ्यांची उत्तरे नकारात्मक भेटतात.जिथे सुरुवात माहित नाही,शेवट काय असेल याचा कयास लावता येत नाही त्या भानगडीत पडायच तरी कशाला!

मायानगरी मुंबईमधली वेश्यावस्ती म्हणजे ग्लॅमर असलेली हवी,झगमगाट असावा,सुंदर सुंदर ललना असाव्यात. असं काहीस चित्र माझ्या मनात होत.कदाचित चित्रपटांचा,कादंबऱ्यांचा हा प्रभाव असावा. परंतु असं काहीही चित्र इथं नव्हतं. अगदी शांतपणे इथला कारभार चालू होता.नेहमीची गिऱ्हाईक मंडळी नेहमीच्या ठिकाणी जात होती.सगळं काही नेहमीसारखं. नावीन्य त्यात नव्हतंच.देहव्यापार करणाऱ्या स्रिया एकमेकींशी गप्पा मारण्यात गुंग होत्या. चहाच्या टपरीवर एका  दारुड्याला टपरीचा मालक मारहाण करत होता. प्रत्येकजण आपलं आपलं काम करण्यात गुंग होते.हे सगळं निरखण्यात वेगळी मजा होती. या वस्तीतून चालत चालत एका चाळीत शिरलो.दणादण डीजेचा आवाज येत होता. 'अफगाण जिलेबी' हे गाणं मोठ्यानं वाजत होत. जवळ जाऊन पाहिलं, तर कळलं कि तिथे कुणाचा तरी वाढदिवस होता.कुणा वेश्येच्या मुलाचा तो पहिलाच वाढदिवस होता. मस्तपैकी मंडप,रोषणाई,सजावट,अशा थाटात तो वाढदिवस त्या चाळीतील प्रत्येक वेश्या साजरा करत होती. डीजेच्या तालावर दंग होऊन कामाठीपुऱ्यातल्या त्या स्रिया नाचत होत्या. नेहमी इतरांची वासना शमविण्यासाठी नाचणाऱ्या त्या, आज स्वतःसाठी नाचत होत्या.बेफाम होऊन नाचत होत्या. त्यात समोरच्याला खुश करण्याचा भाव नव्हता, तर स्वतःसाठी,त्यांच्या त्या लहान मुलासाठी त्या नाचत होत्या.
         लहानग्या मुलाच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव 

आपल्या लहानग्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला जावा असं कोणत्या आईबापाला वाटणार नाही? ज्याचा वाढदिवस होता त्याला आई आहे,पण बापाचं नाव नाही. या वस्तीत 'बाप' लोक येतात पण ते इथल्या स्रियांना आईपण द्यायला. त्यांच्यासोबत अल्पकाळाची शय्या केली जाते खरी पण आयुष्यभराची साथ द्यायला त्यांना कुणीही तयार होत नाही.अगदी त्यांचे सख्खे जन्मदाते सुद्धा. नाचगाणी सुरु असताना कुणी एक माणूस ५०० ची नोट ओवाळणी टाकण्यासाठी घेऊन आला.नाचणाऱ्यांपैकी एकीनेही ती घेतली नाही.घेतील तरी कशाला? ही नावाजलेली एक वेश्यावस्ती आहे, रद्दीचे दुकान थोडेच आहे जिथे जीर्ण कागद देखील स्वीकारले जातील.

***

३.

वाढदिवसाचा जश्न पाहिल्यावर तेथून निघालो. समोर एक तीनमजली माडी आहे. त्या गंजलेल्या जीर्ण वस्तीत ही माडी सहज ओळखू येईल अशी चकचकीत आहे. मित्राची तिथे ओळख असते.आम्ही दोघे इमारतीमध्ये शिरतो,जिन्याने पहिल्या माळ्यावर जातो. आम्हाला बघून तिथले दलाल आमच्याकडे येतात.आम्ही 'गिऱ्हाईक' आहोत अशी त्यांची समजूत झालेली असते.आमच्या हाताला धरून ते समोरच्या खोलीकडे  जाण्यासाठी आम्हाला सांगतात. दरवाज्यात नटून-थटून उभ्या असलेल्या स्रिया आमच्याकडे बघून सौम्य हास्य करत असतात. या सगळ्यांना चुकवून आम्ही आता दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी जिना चढतो. दुसऱ्या माळ्यावर दरवाजात उभी असलेली आक्का आम्हाला बघून नमस्कार करते.मित्र सरळ आतमध्ये घुसतो. त्याच्या पाठोपाठ मी देखील त्या खोलीत शिरतो. खोलीत शिरल्यावर सुरवातीला एक हॉल लागतो. तिथे छानपैकी एक सोफा ठेवलेला असतो. त्या सोफ्यावर आम्ही बसतो.आक्का जवळ येते आणि कुणासोबत जाणार ?,असं विचारते.

समोर ४-५ तरुण मुली उभ्या असतात.आमच्या गोंधळलेल्या नजारा बघून त्यांना मजा येते आहे. त्या आपापसात कुजबुजतात.आम्ही आक्काला येथे येण्याचं प्रयोजन सांगतो. वेश्यावस्तीत ५००-१००० नोटांच्या बंदीचा काय परिणाम झालाय हे जाणून घ्यायला आलोय हे सांगतो. आमचं प्रयोजन ऐकून आक्का जवळजवळ आमच्यावर ओरडतेच. धंद्याच्या वेळी गप्पा मारायला वेळ नाही असं सांगते. मित्र हळूच आक्काच्या हातात १०० ची नोट टेकवतो, आता आक्का हसून आमच्यासोबतच सोफ्यावर बसते.

 आक्का आमच्याशी बोलायला तयार असते.एका पोरीला आवाज देऊन आमच्यासाठी थंड पाणी घेऊन यायला सांगते.अधूनमधून जेव्हा  गिऱ्हाईक येतात तेव्हा आक्का त्यांना बंद खोलीपर्यंत सोडते, कोणत्या तरुणीसोबत जायचं हे सांगते,आणि परत आमच्यासोबत येऊन गप्पा मारते.

हळूहळू आक्का प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करते.थोड्या वेळानंतर तिला काहीही विचारण्याची गरज भासत नाही.आक्का आता सगळं कथन करायला सुरुवात करते.

आक्का सांगते कि ५००-१००० च्या नोटा बंद झाल्यापासून इथे गिऱ्हाईक येणं कमी झालंय. अगोदर दिवसाला १०० गिऱ्हाईक यायचे,तर आता केवळ २०-२५ येतात. इकडे एका शय्येचा भाव ४७० रुपये आहे असं ती सांगते. ५०० रुपयांच्या जुन्या नोटा घ्यायला आमच्या शेठने सांगितलंय तेव्हा जुन्या-नव्या सगळ्या नोटा आम्ही घेतोय. ५०० ची नोट घेऊन कोणी आलं तर ३० रुपये मात्र आम्ही परत देत नाही असं अक्का स्पष्ट करते.

आम्ही बोलत असताना २५-२७ वर्षे वयाचा एक तरुण आत शिरतो.त्याच्या हालचालींवरून तो दारू पिऊन आलेला आहे हे आम्ही सगळे ओळखतो. आक्का त्याला विचारते , किती रुपये आणले? तो खिशातून ५०० ची नोट काढतो.आक्का ती नोट घेते आणि नोट खरी आहे कि खोटी आहे हे निरखून बघते. नोट खरी असल्याची खात्री झाल्यावर त्या तरुणाला एका मुलीसोबत जायला सांगते,आणि सुनावते कि, १० मिनिट जास्त घे हवं तर , पण ३० रुपये परत मिळणार नाहीत.

***

४.

आमच्या गप्पा चालूच असतात.प्रीती नावाची एक तरुणी आमच्याशेजारी येऊन बसते. २८-३० वर्षाची असेल. ही कलकत्त्याची आहे.आमचं बोलणं ऐकून ती स्वतःहून आमच्याकडे आली. तिच्याशी बोट असताना हे कळलं कि, दर तीन महिन्यांनी ही कलकत्त्याला जात असते. हिला लहान-लहान ३ मुले आहेत.आईवडिलांकडे लहानग्या मुलांना टाकून ही इकडे जीवाची मुंबई करते आहे. प्रीती सांगत होती कि प्रत्येक गिऱ्हाईकाकडून इथला दलाल ४७० रुपये घेतो. त्यातले १५० रुपये आम्हाला मिळतात. महिन्याला कसेबसे १०,००० रुपये कमाई होत असते. त्यात घरी मुलांना पैसे पाठवायचे असतात.मुलांची शाळा आहे,आईवडिलांचं दुखणं आहे,कपडालत्ता आहे,खाणंपिणं आहे,माझा इकडचा खर्च आहे.या सगळ्यात पैश्याची मोठी ओढाताण होत असते .आत धंदा मंदीत चालू आहे म्हटल्यावर पैशाची मिळकत होत नाहीये. घरी पैसे कसे पाठवणार याची चिंता हिला लागून राहिलेली आहे.
बोलताना प्रीती आता आगतिक झालेली वाटली.लाली -पावडरने सजवलेल्या तिच्या खोट्या चेहऱ्यावरचं खोटं हसू आता निवळलं होत.

***
५.
तिथेच थोड्या वेळाने समोरच्या बंद खोलीतून एका तरुणासोबत शय्या करून आलेली,आणि त्याच तरुणाला अश्लील शिव्या देणारी बॉबी आमच्या समोर बसली. आत खोलीत या दोघांचं काही तरी वाजलं असेल हे आम्ही ओळखलं.बळजबरीने तो माझे फोटो काढत होता असं ती सांगत होती.ही बॉबी देखील तिशीच्या आतली. बंद झालेल्या ५००-१००० च्या नोटांमुळे ही कमालीची चिंतीत होती.१० वर्षांपासून कामाठीपुऱ्यात देहाचा व्यापार करणाऱ्या हिचे कुठल्याही बँकेत अकाउंट नाही.अकाउंट नाही म्हटल्यावर पैसे कुठे जमा करणार? नोटा कुठे बदलणार? धंदा करायचा कि नोटा बदलीसाठी बँकेच्या  रांगेत उभं राहायचं असे असंख्य प्रश्न हिला पडलेले होते. कालच एका मैत्रिणीच्या अकाउंटवर १५,००० रुपये टाकून आल्याचं ती सांगत होती. जानेवारीत आता तिला तिचे पैसे भेटतील,पण केवळ १३०००. तिची मैत्रीण २००० रुपये कमिशन घेणार आहे.

***
६.
सुरेशसोबत बोलत होतो. सुरेश इथला दलाल आहे. त्याचीसुद्धा कहाणी काही वेगळी नाही.धंदा मंदीत असल्यामुळे तो देखील चिंतेत आहे. पोलिसांना महिन्याला २ लाख रुपये हप्ता द्यावा लागतो,तेव्हाच आमचा हा व्यापार चालतो असं तो सांगत होता. पोलिसांना द्यावा लागणारा २ लाखाचा हप्ता कसा भरून काढायचा, याच प्रश्नावर तो राहून राहून बोलत होता.
रोजचा हप्ता वसूल करायला आलेले पोलीस देखील आता सुट्टे पैसे  मागतात, ५००-१००० च्या नोटा घ्यायला मनाई करतात.तेव्हा त्यांना कुठून पैसे द्यायचे हे सुरेशच आम्हाला विचारतो.
आम्ही '२ लाखांचा हप्ता' हे ऐकूनच स्तब्ध झालो होतो.हा 'व्यापार' किती मोठा आणि किती खोटा आहे हे त्यानिमित्ताने जाणवत होतं. प्रत्येक गिऱ्हाईकामागे  १५० रुपये मिळविणाऱ्या आणि महिन्याला कसेबसे १०००० रुपये कमावणाऱ्या या  वेश्या किती मोठ्या आर्थिक शोषणाचा भाग आहे हे जाणवलं. यांचं सामाजिक शोषण आहेच पण त्याहून भयानक आर्थिक शोषण आहे,हे शोषण थांबावं म्हणून आपल्याकडे आहे का काही कार्यक्रम? कोणाच्या अजेंडयावर आहेत यांचे प्रश्न? यांच्यासाठी कोणता 'स्किल इंडिया' चा कार्यक्रम आहे आपल्याकडे? स्मार्टसिटीच्या योजनेत कामाठीपुरा येईल का कधी? याची उत्तरे १००% नकारात्मक भेटणार आहेत.

कामाठीपुरा- आर्थिक आणि सामाजिक शोषणाचा काळा बाजार 

इथला सगळं व्यापार हा रोखीच्या व्यवहारातून चालतो.इथे कुठलेही स्वॅप मशीन चालत नाही.सेवा घ्या आणि रोख पैसे ठेवा अशी इथली व्यवहार पद्धत आहे. ५००-१००० च्या नोटबंदीमुळे इथे आलेली आर्थिक मंदी भयानक आहे. महिला सहनशील असतात हे खरं,पण  या महिला इतर महिलांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या अधिक सहनशील आहेत.त्यांचं होणार लैगिक शोषण,सामाजिक दमन, आर्थिक शोषण त्या निमूटपणे सहन करत आलेल्या आहेत आणि आजही सहन करत आहेत.बचत म्ह्णून साठवलेले पैसे कुठे भरायचे,कुठल्या बँकेत भरायचे,त्यासाठी काय प्रक्रिया असते,एका वेळी किती पैसे भरायचे,किती पैसे काढायचे हे त्यांना अजूनही स्पष्ट नाही.शिक्षण नसल्यामुळे अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.

शेवटी निघताना आक्काचा निरोप घ्यायला गेलो,तेव्हा हातात हात घेत आक्का म्हणाली, पोरा,आमच्याकडे येणारा प्रत्येक पैसा हा काळाच असतो. आमचा धंदा हा काळा बाजाराचं आहे हे आम्ही मान्य करतो.पण देशाचे लुटेरे तिथे कर्ज बुडवून देशातून पळून जातात त्यांना पकडायचं सोडून आमच्यासारख्या गरिबांच्या मागे हे सरकार का लागतंय? सरकार कुठलंही येऊ दे,आमच्यासाठी कुणीच काही करत नाही.आम्ही काल देखील उपरेच होतो,आज थोडं आणखी उपरे झालोत एवढंच.

                 
              

माध्यमांची नैतिकता,रवीशकुमार आणि सरकार

NDTV वर सरकारने केलेल्या कारवाईनंतर अनेकांगी चर्चा चालू झाल्या.  भाजप सरकार सत्तेवर आहे म्हणून भाजप विरोधी लोक आकांडतांडव करत आहेत असे समजण्याचे कारण नाही. संपुआ सरकारच्या कार्यकाळात देखील झाल्या होत्या अशा घटना.देशहिताच्या, समाजहिताच्या विरोधात काही प्रक्षेपण होत असेल तर त्याला आळा घालणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तसे त्यांना संविधानिक अधिकार देखील आहेत. त्याबद्दल वाद नाही. 2005 ते 2013 या कार्यकाळात एकूण 28 वेळा सुमारे 20 चॅनेलवर NDTV वर जशी कारवाई झाली, अगदी तशाच स्वरूपाच्या कारवाई झाल्या आहेत.



आजवर कोणत्या चॅनेल वर कारवाई केली गेली.

 1. जनमत, 2007
 2007 मध्ये जनमत टीव्ही वर कारवाई केली गेली. कारण होते बनावट स्टिंग ऑपरेशन.सुमार महिनाभर या टीव्हीवर प्रसारणासाठी बंदी घालण्यात आली होती. प्रकरण असे होते कि, एक महिला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत सेक्स रॅकेट चालवते आहे असे जनमतचे संशोधन होते. त्यांनी त्यानुसार स्टिंग ऑपेरेशन केले, झाल्या प्रकारामुळे खळबळ माजली. संबंधित महिला शिक्षिकेवर लोकांनी जीवघेणा हल्ला देखील केला.परंतु तपासात असे निष्पन्न झाले कि महिला शिक्षिका निर्दोष होती. समाजस्वास्थ बिघडवण्याचे काम जनमत ने केले होते म्हणून त्यांच्या  प्रसारणावर महिनाभर बंदी घातली गेली.
हे स्टिंग जेव्हा केले गेले तेव्हा,सुधीर चौधरी हे जनमतचे सीईओ-संपादक होते.आता ते झी न्यूजचे एडिटर आहेत. त्यांच्यावर कोळसा घोटाळ्याची बातमी न दाखवण्यासाठी जिंदाल समूहाकडून 100 कोटी लाच मागितल्याचा आरोप होता.सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. जेएनयु मधल्या कथित देशविरोधी प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता खोटे व्हिडियो न्यूज चॅनेलवर दाखवून संपूर्ण जेएनयुमधल्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरविण्यात यांचा मोठा वाटा राहिला आहे.

2. फैशन टीवी, 2007, 2010, 2013
फॅशनच्या दुनियेतील महत्वाचा आणि कायम चर्चेत राहणारं हे चॅनेल. 2007 ते 2013 दरम्यान 3 वेळा हा चॅनेल ऑफ एयर केला गेला.पहिली बंदी 2 महिन्यांसाठी होती.कारण होते ‘मिडनाइट हॉट’ हा कार्यक्रम. अश्लील दृश्य दाखविल्याप्रकरणी ही कारवाई होती.2010 मध्ये पुन्हा एकदा बंदी घातली गेली, ही बंदी 9 दिवसांची होती, यावेळी कारण होते टॉपलेस महिला मॉडेल दाखविल्याचे. 2013 मध्ये पुन्हा एकदा अश्लील दृश्य दाखविल्याप्रकरणी 10 दिवसांसाठी या चॅनेलच्या प्रसारणावर बंदी होती.

3. महुआ टीवी, 2013
25 एप्रिल  , 2013 ला महुआ टीव्ही एक दिवसासाठी बंद ठेवला गेला. कारण हे होते कि प्राईम टाइम मध्ये या चॅनेलने ‘ए’ सर्टिफिकेट असलेल्या  ‘औलाद’ आणि  ‘एक और कुरुक्षेत्र’ या दोन चित्रपटांचे प्रक्षेपण केले.

4. AXN, 2013
25 एप्रिल  , 2013 ला AXN चॅनेल वर देखील एकदिवसीय बंदी घातली गेली. या चॅनेलने देखील  ‘ए’ सर्टिफिकेट असलेला डार्कनेस फॉल्स' हा सिनेमा प्रदर्शित केला होता.

5. मूवीज ओके, 2013
1 मे 2013 रोजी मुव्हीज ओके या चॅनेलवर देखील एक दिवसाच्या प्रक्षेपणावर बंदी घातली गेली.कारण होते कि त्यांनी देखील प्राईम टाईम दरम्यान ‘दिलजले’ हा ‘ए’ सर्टिफिकेट असलेला सिनेमा प्रदर्शित केला होता.

6. कॉमेडी सेंट्रल, 2013
17 मई, 2013 रोजी,या चॅनेलवर 10 दिवसांच्या प्रक्षेपण बंदीची कारवाई केली गेली.कारण होते, ‘स्टैंड अप क्लब’ हा प्रोग्रॅम. यात अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा आरोप होता.

7. WB, 2014
16 जनवरी, 2014 रोजी  ‘WB’ चॅनेलवर देखील एकदिवसीय प्रक्षेपणावर बंदी घातली गेली होती.कारण होते त्यांनी दाखविलेला  ‘इट्स अ बॉय गर्ल थिंग’ हा अडल्ट सिनेमा.

हा सगळा झाला आतापर्यंतचा इतिहास. माहिती व प्रसारण मंत्रालय, मग ते भाजप चे असोत किंवा काँग्रेसचे असोत, त्यांनी अशा  प्रकारच्या कारवाई आजपर्यंत केल्या असल्याचा इतिहास आहे. तसे त्यांना संविधानिक अधिकार आहेत. वर पाहिलेल्या 7 प्रकरणात एकटे न्यूज देणारे जनमत चॅनेल सोडले तर बाकी सगळे मनोरंजन करणारे चॅनेल आहेत.न्यूज चॅनेलवर अशा कारवाई फार कमी झाल्या आहेत. आपल्याकडे माध्यमांचे स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. ऑथोरॅटरियन रुल आपल्याकडेही आता लागू होतो आहे कि काय अशी शंका आहे. कारण, सुरक्षेच्या कारणावरून जर NDTV वर  कारवाई होत असेल, तर मग ज्या ज्या चॅनेल ने पठाणकोट हल्ल्याचे सविस्तर वृत्तांकन केले त्यांच्यावर देखील तसाच नियम लागू करायला हवा होता. पण तसे झाले नाही. रवीशकुमार हा प्रतिभावंत पत्रकार कायम हुकूमशाहीच्या विरोधी भूमिका घेत असतो, भांडवलदारी व्यवस्थेच्या विरोधात कष्टकऱ्यांच्या बाजूने उभा असतो. माध्यमांची नैतिकता काय आहे हे या माणसाकडून शिकावे. अर्णब गोस्वामी सारखा आततायीपणा रविशच्या कुठल्याही कार्यक्रमात आजवर दिसलेला नाही. बायस न होता वार्तांकन करणे हे फार कमी पत्रकारांना जमते, रवीशकुमार त्यातलेच एक आहेत.

खरे तर या निमित्ताने चर्चा अशी व्हायला हवी कि, आणीबाणीच्या काळात देशहितासाठी कसे वार्तांकन केले जावे यासाठी माध्यमांना कुठल्या गाईडलाईन्स असाव्यात. 26/11 हल्ल्यानंतर आपल्याला हा प्रश्न भेडसावला होता. अतिरेकी हल्ला कसा कव्हर केला पाहिजे याचे ज्ञान भारतीय माध्यमांकडे नव्हते (नेपाळ भूकंपानंतर आणि उत्तराखंड जलप्रलयानंतर भारतीय माध्यमांनी केलेल्या वार्तांकनानंतर अजूनही हे भान आपल्याकडल्या माध्यमांना नाही हे जाणवले आहे) त्यामुळे जे भेटेल ते लाईव्ह दाखविणाच्या फंदात आपण सगळं काही पाकिस्तानस्थित अतिरेक्यांना आयत दाखवलं.त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्यातून देखील आपण काही शिकलो नाही. अजूनही आपल्याकडे माध्यमांना अशा गाईडलाईन्स नाही. PTI ने घालून दिलेले नियम या देशातला एकही वृत्तपत्र, न्यूजचॅनल पाळत नाही.नियम करून सगळे प्रश्न सुटत नाही.तसे असले असते तर जेएनयु देशद्रोही ठरले नसते आणि झी मीडियाने जाहीरपणे देशाची माफी मागितली असती.

असो, तर मुद्दा हा आहे कि NDTV घातलेली एकदिवसीय प्रक्षेपणाची बंदी चूक कि बरोबर. ही बंदी म्हटलं तर चुक आणि म्हटलं तर बरोबर देखील आहे. चूक यासाठी कि रवीशकुमारसारख्या संयमित पत्रकारावर हेतुपुरस्पर केलेली कारवाई. NDTV ला वेगळा न्याय आणि इतर चॅनेलला वेगळा न्याय कशासाठी? समाजस्वास्थाची एवढीच चिंता होती तर मग झी न्यूजबद्दल अशी कारवाई का केली गेली नाही?

सर्जिकल स्ट्राईकच्या गप्पांमध्ये  आपला देश मागच्या आठवड्यात ढवळून निघाला. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आपापल्या विद्यमान सरकारने संपूर्ण जगाला माहिती दिली. कारवाई कशी केली, कधी केली आदी गोष्टी सविस्तर सांगितल्या. आपल्या सैन्याच्या कूटनीतीबद्दल जर सरकारच असा खुलासा जगासमोर करत असेल तर माध्यमांकडून सरकारने अपेक्षा का ठेवावी?
देशहितासाठी हे  किती घातक आहे हे 56 इंच छाती असलेल्या प्रधानसेवकाला अजून कळलेले दिसत नाही. NDTV वर कारवाई करण्यासाठी सरसावलेले सरकार, खुद्द संरक्षणमंत्र्यांबाबत काय भूमिका घेईल? सरकार भूमिका घेणार नाही. सरकारला तशी भूमिका घेण्याची सवय देखील नाही. केवळ आणि केवळ आततायीपणा दाखविण्यात विद्यमान सरकार सरसावलेले आहे. पूर्वग्रह ठेऊन सरकार निर्णय घेतंय.
परवा रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार सोहळ्या दरम्यान पत्रकार राजकमल झा यांनी व्यक्त केले मत अगदी बरोबर आहे,ते म्हणतात  "ज्यांना वाटते कि चांगली पत्रकारिता आता उरली नाही आणि सरकारने पत्रकारांना विकत घेतले आहे. चांगली पत्रकारिता मेलेली नाही,मरत नाही.उलट अशी पत्रकारिता वाढते आहे, बहरते आहे.एक वाईट गोष्ट मात्र ही आहे कि, खोटी पत्रकारिता सध्या मोठ्या प्रमाणात गोंगाट करते आहे, गेल्या 5 वर्षात असे चित्र नव्हते".
हे खरे आहे कि खोटी पत्रकारिता आता जास्त गोंगाट करते आहे, पण वैषम्य या गोष्टींचं आहे कि सरकार देखील आता या गोंगाटात आपला सूर मिळविण्याच्या कामी लागली आहे. सरकार यात इतकं व्यस्त आहे कि, बागो मैं बहार है? या सध्या प्रश्नाचे उत्तर देताना देखील त्यांना अनेकदा डोके खाजवावे लागत आहे.

मोदींसमोर पत्रकार राजकमल झा यांनी केलेलं चर्चित भाषण.

बुधवारी नवी दिल्लीत पत्रकारितेत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'रामनाथ गोयंका पुरस्काराचे वितरण केले गेले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले गेले.मोदी सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या पत्रकारांना देखील या कार्यक्रमात मोदींना पुरस्काराने सन्मानित करावे लागले. पत्रकार आणि लेखक म्हणून नावाजलेले अक्षय मुकुल यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला होता, परंतु या कार्यक्रमाला न येणे त्यांनी पसंद केले आणि कारण सांगितले कि  मोदींच्या सोबत एकाच 'फ्रेम' मध्ये येणे आवडणार नाही!

अक्षय मुकुल यांच्या या भूमिकेपेक्षा अधिक चर्चा झाली ती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना राजकमल झा यांनी केलेल्या भाषणाची. राजकमल झा हे गोयंका ग्रुपच्या 'द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाचे संपादक आहेत. अक्षय मुकुल यांच्या प्रमाणे कार्यक्रमापासून दूर राहण्या ऐवजी संवादाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. या आभार प्रदर्शन भाषणात त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्याजोगे आहेतच,सोबतच मोदींच्या समोर त्यांनी व्यक्त केलेली भूमिका सरकारला आणि पत्रकारिता जगताला ठिकाणावर आणणारी आहे. त्यांच्या भाषणाचा हा मराठी अनुवाद.
प्रधानमंत्री मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे पत्रकार आणि स्वतः मोदीजी 



राजकमल झा, हे मोदींच्या भाषणानंतर विचारपीठावर आले आणि बोलायला लागले...

खूप खूप धन्यवाद प्रधानमंत्री मोदीजी.
तुमच्या 'स्पीच' नंतर आम्ही सगळे 'स्पीचलेस' झालो आहोत.परंतु मला आभार मानताना आणखी काही बोलायचे आहे.तुमच्या शब्दांसाठी आभार.तुमचे येथे असणे म्हणजे एक मजबूत संदेश आहे.आम्ही विश्वास व्यक्त करतो कि चांगली पत्रकारिता ही अशा कामांमुळे चर्चिली जावी ज्या कारणामुळे इथे आजच्या संध्याकाळी  पत्रकारांना आणि संपादकांना सन्मानित केले गेले आहे.

चांगली पत्रकारिता काय असते हे 'सेल्फी पत्रकार' ठरवणार नाहीत. ही सेल्फी पत्रकारिता करताना आजकाल आपल्याला अनेकजण दिसतील.हे लोक त्यांचे 'चेहरे' आणि 'विचार' यांत अंतर ठेवतात, कॅमेराचे तोंड हे लोक कायम स्वतःकडे ठेवतात.त्यांच्या दृष्टीने एकच गोष्ट महत्वाची असते, त्यांचा आवाज आणि त्यांचा चेहरा.याशिवाज जे काही आहे ते सगळे इथल्या भूमीत आहे.जसे कि विनाकारण केलेला गोंगाट! या सेल्फी पत्रकारितेत तुमच्याकडे काही तथ्य नसले तरी हरकत नाही, फ्रेम मध्ये केवळ एखादा झेंडा असायला हवा, आणि तुम्ही त्या झेंड्यामागे लपा!

धन्यवाद सर, तुम्ही विश्वसनीयता बद्दल बोललात.ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्यातून आम्ही पत्रकार काही शिकू शकतो. तुम्ही पत्रकारांबद्दल काही चांगल्या-चांगल्या गोष्टी देखील बोललात, त्याबद्दल आम्ही थोडे नर्वस आहोत.

तुम्हाला ही गोष्ट  विकिपीडियावर मिळणार नाही,परंतु मी इंडियन एक्सप्रेसच्या संपादक पदावर असल्याकारणाने सांगू शकतो कि, रामनाथ गोयंका यांनी एका पत्रकाराला नोकरीवरून काढले होते. याचे कारण होते, कि कोणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले कि, तुमचा पत्रकार खूप छान काम करतो आहे.
या वर्षी मो 50 वर्षांचा होणार आहे, तेव्हा मी हे सांगू शकतो कि आजच्या काळात आपल्याकडे असे पत्रकार आहेत जे रिट्विट आणि लाईक्स च्या युगात तरुण होत आहेत, ज्यांना माहित नाही  कि सरकारकडून आपली केली जाणारी निंदा आपल्यासाठी खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.
आपण जेव्हा कधी कुना पत्रकारची स्तुती ऐकू तेव्हा, ज्यापद्धतीने चित्रपटात स्मोकिंग सीनच्या दरम्यान स्क्रीनवर खबरदारीचा उपाय म्हणून पट्टी चालते, त्यापद्धतीने आपण देखील एक पट्टी चालवायला हवी कि, सरकारतर्फे केली जाणारी आलोचना पत्रकारितेसाठी शानदार खबर आहे. मला वाटते कि ही गोष्ट पत्रकारितेसाठी खूप खूप महत्वाची आहे.

आभारप्रदर्शन भाषण करताना गोयंका ग्रुपच्या 'द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाचे संपादक राजकमल झा.

या वर्षी आमच्याकडे या पुरस्कारासाठी 562 निवेदने आली.गेल्या 11 वर्षातील ही सगळ्यात जास्त निवेदने आहेत.हे त्या लोकांना उत्तर आहे ज्यांना वाटते कि चांगली पत्रकारिता आता उरली नाही आणि सरकारने पत्रकारांना विकत घेतले आहे. चांगली पत्रकारिता मेलेली नाही,मरत नाही.उलट अशी पत्रकारिता वाढते आहे, बहरते आहे.एक वाईट गोष्ट मात्र ही आहे कि, खोटी पत्रकारिता सध्या मोठ्या प्रमाणात गोंगाट करते आहे, गेल्या 5 वर्षात असे चित्र नव्हते.

शेवटी मी आजच्या संध्याकाळी येथे आलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद मानतो. इथे सत्तेत असलेले लोक आहेत, विरोधी पक्षातले लोक आहेत.आपण सगळे जाणतो कि कोण कोण आहेत.परंतु ते जेव्हा पत्रकारितेची स्तुती करतात तेव्हा काही फरक पडत नाही.तुम्ही हे जाणून घेऊ शकत नाही कि कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधी पक्षात आहे.हे अशाच पद्धतीने झाले पाहिजे.
खूप खूप धन्यवाद.



अनुवाद: सागर भालेराव