बलात्कारात "महा"न राष्ट्र???

   हा blog १० दिवसांपूर्वी लिहिला होता,परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो आता प्रकाशित करीत आहे.

          राकट देशा,कणखर देशा,दगडांच्या देशा असं लहानपणी महाराष्ट्राचं वर्णन आम्ही शिकलोय.१५/१६ वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि आताचा महाराष्ट्र यात आता कुठलंच साधर्म्य उरलेलं नाहीये.गेल्या १५/१६ वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलंय.लोकांच्या जाणीवा थंडावल्यात. आता राकट मनांचा,कणखर संवेदनांचा आणि दगडी काळजाचा देश असं जरी महाराष्ट्राचं वर्णन केलं तरी ते चुकीचे ठरू नये. असं निराशाजनक सामाजिक वातावरण आजूबाजूला पाहायला मिळते आहे.२० ऑगस्टला आपण एकीकडे रक्षाबंधन साजरा करत असताना अंधश्रद्धेची बंधने जुगारून जुलमी व्यवस्थेला चपराक देणाऱ्या प्रबोधनकार डॉ.नरेंद्र दाभोळकरांची  तथाकथित सुसंस्कृत शहरात दिवसाढवळ्या हत्या होते आणि पत्रकार असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर कधीही न झोपणार्या मुंबई शहरात बलात्कार होतो,यापेक्षा शोकांतिका अजून काय असू शकते??
          बलात्काराची प्रकरणे आपल्याला  फार नवी नाहीत.प्रत्येक ५२/५४ मिनिटाला आपल्या देशात बलात्काराची घटना घडत असते.बऱ्याच घटना या उंबऱ्याआड घडतात आणि उंबऱ्याच्या आतच त्याची गळचेपीसुद्धा होते. निर्भया प्रकारानंतर रणरागिणी कुठे याबद्दल बोलायला लागल्या आहेत.प्रत्येक वेळी बलात्कार झाल्यावर लैगिक शिक्षण,स्वसंरक्षण या सगळ्या गोष्टीचं गुऱ्हाळ सुरु होत.परंतु हा प्रश्न इतका सहजासहजी सुटण्यासारखा मुळीच नाही.आपल्या संस्कृतीतच पूर्वीपासून स्रियांना समाजात दुय्यम स्थान देण्याची फार मोठी परंपरा आहे.लाखो करोडो "अहिल्या" अजूनदेखील पुरुषी संस्कृतीचा आभिशाप भोगत आहेत.मुंबईतील महालक्ष्मि मध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास हा बलात्कार होतो आणि तो पण एका महिला पत्रकारावर!! हीच गोष्ट आपल्या सामाजिक मागासलेपणावर बरंच काही सांगून जाते. बलात्कार हा बलात्कार असतो,तो सडकेवर भिक मागणाऱ्या लहानग्या मुलीवर असो वा कारमध्ये फिरणाऱ्या धनिकाच्या मुलीवर असो,त्याबद्दल दुमत नाही.परंतु पत्रकार या शब्दाला एक सामाजिक वजन आहे.लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या या वर्गातील एका प्रतिनिधीची जर अशी अवस्था असेल तर सामान्य स्रीयांनी त्यांच्या स्वतःच्या संरक्षणाबद्दल आश्वासक का रहावं?? 
चंगळवादाकडे वाहवत जाणारी तरुणाई जर स्रीला भोगवादाचे साधन मानत असेल तर आपण अजूनही राजाराम  मोहन  रॉय यांच्या प्रतीक्षेतच आहोत का??? असं प्रश्न पडतो. पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून या प्रकरणामुळे सकाळ पासून अस्वस्थ होतो ,विद्यापीठात गेल्यानंतर साहजिकच हा चर्चेचा मुद्दा होता,या चर्चेदरम्यान एक नवा विचारप्रवाह आपल्या तरुणाईत तयार होतो आहे असं जाणवलं.एका मित्राचे असे म्हणणे होते कि,मुळात त्या मुलीने इतक्या रात्री त्या परिसरात जायचंच कशाला? पत्रकार असली म्हणून काय झालं? तिला सामान्य मुलीसारख्या मर्यादा आहेतच कि,आणि विशेष म्हणजे त्याच्या या विधानाला काही मुली सुद्धा समर्थन देत होत्या.त्यावेळी खरच जाणवलं कि,असे लाखो आसाराम बापू आपल्या समाजात आहेत.त्यांच्या मनावर अजूनही मनुस्मृती अधिराज्य गाजविते आहे.कायद्याने सगळेच प्रश्न सुटणार नाही,कायद्याला पद्धतशीरपणे पळवाटा काढणारे आपणच आहोत. निर्भया प्रकरणानंतर न्या.वर्मा समिती नेमली गेली.या समितीने सुचविलेल्या प्रावधानांवर वटहुकुम देखील काढला गेला. कायदा झाला तरी लोकांच्या मानसिकतेत काहीच बदल झालेला नाही.परस्रीला मातेसमान मानणाऱ्या समाजात व्यक्ती जेव्हा अशी कृती करतात तेव्हा "वन्दे मातरम" नव्हे तर "गंदे मातरम"  अशीच आरोळी आपण द्यायला काय हरकत आहे? विलासवादी स्वप्ने बघणाऱ्या तरुणाईला कायद्याचा बडगा जरूर दाखवला पाहिजे.परंतु त्याच वेळी भारताचे सुजाण नागरिक असल्याची आणि कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी आपण कटीबध्ह आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.जेव्हा प्रत्येक नागरिक सुज्ञबनेल तेव्हा आपसूकच देश सुद्धा सुज्ञ बनेल.
          या प्रकारानंतर मा.मुख्यमंत्री महोदयांनी पिडीत तरुणीवरच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकार करेल असे जाहीर केले.मुख्यमंत्र्यांनी जर या अगोदरच महिलांना सुरक्षित वाटेल असे आश्वासक वातावरण जर राज्यात तयार केले असते तर आज हि वेळच आली नसती.सदर प्रकरणावरून "राज"कारण सुद्धा चालू झाले आहे. कोणत्या गोष्टीच राजकारण करावं आणि कसलं करू नये हे सुद्धा नेत्यांना कळू नये हि गंभीर बाब आहे.प्रत्येक नागरिकाने स्वतः जरी नैतिकता पाळली तरी बऱ्यापैकी या घटनांना विराम लागू शकतो.आपल्या आयाबहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करायला हवा.सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे आणि फातिमाबी शेख यांच्या महाराष्ट्रात जर स्रियांची अशी अवस्था असेल तर आपल्यासारखे करंटे आपणच! सामाजिक परिवर्तनाच्या गप्पा मारणाऱ्या सामुदायानेसुद्धा याबाबत गंभीर विचार करायला हवा. स्रीला देवी म्हणून देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा ,आणि "बाईमाणूस" म्हणून नव्हे तर "माणूस" म्हणून वागणूक देऊ,तेव्हाच स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्यासाठी महाराष्ट्र लायक असेल.  

आम्ही सगळे दाभोळकर...!!!

                
               काल सकाळी सकाळी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यावर विद्येच माहेरघर(?) असलेल्या पुण्यात खुनी हल्ला झाल्याची ब्रेकिंग न्यूज पाहिली आणि आपण मध्ययुगीन भारतातच राहतो आहोत कि काय असा प्रश्न पडला.डॉ.दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती हे समीकरण फार वर्षापूर्वी आपल्या तथाकथित पुरोगामी (?) महाराष्ट्रात रूढ झालेलं होत.समाजवादी,विज्ञान निष्ठेची परंपरा आपल्या देशाला जरूर आहे.परंतु,मुलतत्ववाद्यांच्या डोक्याला लागलेली दैववादाची अन अंधश्रद्धेची कीड अजून गेलेली नाहीये,हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.दाभोळकर सरांचे २ व्याख्यान ऐकण्याचा अन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला लाभला.दाभोळकर सर तासनतास अंधश्रद्धा,कर्मकांड,भानामती,विज्ञानवाद  या विषयावर बोलत राहायचे.प्रत्येकाला उत्तर देताना,शंकानिरसन करताना  हा माणूस कधीही थकला नाही. गेल्या १८ वर्षापासून "जादू-टोणा विरोधी विधेयक"  आपल्या कार्यसम्राट   लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात मंजूर करावं यासाठी ते अविरत लढले.त्यांच्या या प्रस्तावित विधेयकामुळे ज्या कुणा समुदायाच अर्थकारण बिघडणार होत,त्यांनी याला प्रखर विरोध केला.हिंदू संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता उचललेल्या बांडगुळांनी नथूरामच्या रुपात शेवटी डाव साधलाच! दै.सनातन प्रभात मधून जहरी भाषेत दाभोळकर यांच्यावर  टीका केलेली असायची.दाभोलकरांना देशाचा "ग्यालेलिओ "  ठरवत,धर्माच्या आणि दैववादाच्या विरोधात गेलात तर गांधींसारखे हाल होतील असे देखील सुनावले.परंतु अशा धमक्यांना सरांनी कधी भिक घातली नाही .चर्वाकापासून तुकारामापर्यंत आणि महात्मा फुल्यांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समृध्द विचारांचा वारसा सरांनी आयुष्यभर जपला.
     विचारांची लढाई हि विचारांनीच करायची असते हि अहिंसेची शिकवण "फ्यासिस्ट" शक्ती विसरलेल्या आहेत.एकटा दाभोळकर मारून काय मिळणार आहे तुम्हाला? दाभोळकर सरांचा देह माराल पण त्यांचे विचार,विवेकवाद कसा नष्ट कराल? स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून समाजाचा डॉक्टर होण्याचा खडतर मार्ग या प्रबोधनकाराने स्वीकारला.पुरोगामी चळवळीत प्रत्येक आंदोलनात,मोर्चात हा माणूस शिलेदार राहिला.डॉ.आंबेडकरांनी तयार केलेल्या "हिंदू कोड बिलाची" अशीच परवड झाली.सनातन्यांच्या विखारी टीकेला त्यांना सुद्धा समोर जावं लागलं.हिंदू धर्मसंस्कृतीत हि अफरातफर करायचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. परंतु थोडीबहुत नैतिकता असलेल्या तेव्हाच्या जनसमुदायाने हत्येचा मार्ग निवडला नव्हता!!

                किती काळ आपण आपल्या घाणेरड्या रूढी पाळणाऱ्या संस्कृतीचा अभिमान जपणार आहोत??संस्कृतीचा आभिमान जरूर हवा पण गर्व कशाला??ज्या संस्कुतीमध्ये नरबळी,यज्ञात पशुहत्या,देवदासींचे लैगिक शोषण होते,ती आपली संस्कृती म्हणून आपण गोडवे गायचे आहेत का??? समताधीष्टीत समाजरचनेचा पाया हा विज्ञानवादावर अवलंबून आहे हे न समजण्यासारखे मूर्ख आहोत का आपण??  फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे किती दाभोळकर मारले गेल्यावर ढिम्म प्रशासन जागे होणार आहे?? 
                 सनातन्यांनी हे जरूर लक्षात ठेवावे कि त्यांच्या विचारांची मशाल अजून धगधगते आहे.संस्कृतीरक्षणाचे  गोडवे गाणाऱ्या आणि धर्मावर संकट येणार म्हणून गळे काढणाऱ्या गांडूच्या अवलादींनी हे नीट समजून घ्यावे.या प्रकारामुळे खंर तर महाराष्ट्र ५०/६० वर्ष मागे गेलाय.विचारांच्या लढाईमध्ये डॉ.दाभोळकर नामक शरीराचा बळी गेलाय.त्यांचे हे योगदान इतिहासात सुवर्णअक्षराने लिहिले जाणार आहे .एकीकडे धर्मवादी,कट्टरपंथी  "नरेंद्रच" कौतुक आणि दुसरीकडे प्रबोधनकार "नरेन्द्रांची" हत्या,आपल्याला अराजकतेकडे घेऊन जाणार आहे.चार्वाक,एकलव्य,शम्भूक,गार्गी,फुले,शाहू आणि आंबेडकरांच्या पंक्तीत आज दाभोळकर सर विराजमान झालेले आहेत. त्यांच्या जाण्याने चळवळीचा शिलेदार हरपलेला जरूर आहे परंतु त्यांच्या विचारांची समृद्धी प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्याकडे आहे.निरीश्वरवादाच्या सिद्धांताचे समर्थन करणाऱ्या सरांच्या आत्म्यास शांती लाभो असे मी म्हणणार नाही.पंचतत्वात विलीन झाल्यावर निसर्गातील प्रत्येक अणु-रेणू स्वतःच वेगळ अस्तित्व सांगत असतो,सरांच देखील समाजातील स्थान अढळ असंच आहे.सरांच राहिलेलं अपूर काम आता आपण युवक पूर्ण करूयात.कारण आपल्या प्रत्येकात दाभोळकर  आहे,जो धर्माविरोधात एल्गार पुकारणार आहे आणि बिनिवरति घाव घालणार आहे कारण "आम्ही सगळे दाभोळकर" आहोत!!! 

इंजि.सागर भालेराव
9595842238