शरद यादवांची बेरीज वजाबाकी

 शरद यादवांची बेरीज वजाबाकी

शरद यादव हे भारतीय राजकारणात असलेले अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत. नीतीश कुमार, मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव आणि राम विलास पासवान हे नेते जेव्हा बहुजन अस्मितेचे आंदोलन देशपातळीवर आणण्यासाठी लढत होते, तेव्हा त्यांचे खंबीर नेतृत्व शरदजींकडेच होते. आपल्या आयुष्यातील जवळजवळ चार दशके या माणसाने भारतीय राजकारणात सक्रियपणे घालवली.जयप्रकाश नारायण ते अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम करण्याचा त्यांचा प्रवास बहुरंगी आणि बहुढंगी राहिला. त्यामुळेच ७ वेळा लोकसभा आणि ४ वेळा राज्यसभेवर निवडून येणं हे केवळ त्यांनाच जमलं.



असं असलं तरीही लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्या इतकं जनसमर्थन त्यांना मिळालं नाही हे तितकच खरं.एक प्रादेशिक पक्ष स्थापन करण्यासाठी आणि चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वकांक्षेचा अभाव शरद यादवांकडे असल्याचा सूर राजकीय विश्लेषक कायम आळवत असतात.असं का घडलं यावर एक वेगळी चर्चा केली जाऊ शकते. त्यावर भाष्य करण्याचं येथे प्रयोजन नाही. ही पार्श्ववभूमी असली तरीही आजच्या घडीला पिछड्या जातींसमूहाचं नेतृत्व म्हणून आणि उत्तर भारतातील अन्य समुदायातील नेत्यांची स्वीकृती असलेले ते एक महत्त्वपूर्ण राजकारणी आहेत.


विपक्ष एकता व्हावी यासाठी जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तेव्हा शरद यादवांना डावलण्याचा विचार कुठल्याही पक्षाच्या मनात आला नाही यातच त्यांची क्रेडिबिलिटी दडलेली आहे. नरेंद्र मोदींना विरोध म्हणून  शरद पवार आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षाच्या सरदारांनी शड्डू ठोकला आहे. हिंदी बेल्टमध्ये मोदींना आव्हान द्यायचे काम जर कुणी करू शकणार असेल तर ते शरद यादव आहेत हे आता स्पष्ट आहे. हरियाणातील ओम प्रकाश चौटालापासून बिहारच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह ते गुजरातचे छोटुभाई वसावा यांच्यासारखे छोटे-मोठे खेळाडू आजही यादवांशी एकनिष्ठ आहेत. कम्युनिस्ट पक्षांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. भारतात डावी चळवळ जेव्हा जोर धरत होती तेव्हा कम्युनिस्टांच्या पहिल्या पिढीचे हितचिंतक म्हणून शरदजी होते हे आज कुठलाही कम्युनिस्ट नेता बिनदिक्कतपणे सांगू शकतो.  यावरून त्यांचे महत्व अधोरेखित होते.


दिल्लीतील सगळेच नेते मंडळी त्यांना आदराने पाहतात. देशाच्या राजकारणात त्यांनी केलेली कामगिरी आणि त्यांचं योगदान नजरेआड करू शकत नाही. नितीशकुमारांनी मात्र त्यांना नजरेआड केलं,त्यांची राजकीय कारकीर्द संपवावी म्हणून जंग जंग पछाडलं. हे सगळं होईपर्यंत शरद यादवांचं महत्व आमच्या पिढिला जाणवलं नाही. परंतु भाजपसोबत जाण्याचा नितिशकुमारांचा आत्मघाती निर्णय जेव्हा त्यांनी फेटाळला आणि प्रसंगी आपलं राज्यसभा सदस्यत्व पद देखील पणाला लावलं तेव्हा कुठे आमच्या पिढीला त्यांची नव्याने ओळख झाली. बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाता काँग्रेसला जवळ करावे असा त्यांचा आग्रह होता. अडवाणींची जी अवस्था आज भाजपमध्ये आहे तीच अवस्था जदयूमध्ये शरद यादवांची झाली. आपल्या मेहनतीने फुलवलेला मळ्यावर जेव्हा कुणी कब्जा करतो आणि तुम्हाला अडगळीत टाकतो तेव्हा तुमची नेमकी परिस्थिती काय असते हे आजच्या घडीला केवळ लालकृष्ण अडवाणीच सांगू शकतात. अडवाणी भाजपमधून बाहेर पडू शकत नाही.त्यांच्याकडे तिथेच खितपत पाडण्याशिवाय दुसरा विकल्प नाही. शरद यादव मात्र याबाबतीत सरस आहेत.पक्षातून बाहेर पडायचं असेल तर विचारधारेच्या संचिताशिवाय दुसरं काहीही त्यांच्याकडे नव्हतंच.त्यामुळे ते सहजासहजी निर्णय घेऊ शकले आणि लोकतांत्रिक जनता दलाची स्थापना करू शकले. त्यामुळेच देशातील जवळजवळ सर्वच पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष प्रभावित झालेले आहेत. शरद यादवांची हीच खमकेगिरी त्यांच्या राजकीय आयुष्याला उभारी देणारी ठरणार आहे.


विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला प्रचंड आशावाद आहे. राजकारणात केवळ आशावाद असून जमत नाही तर त्याला गुणाकार आणि भागाकारांचे समीकरणही लागते . शरद यादवांनी 'अजगर' (अहिर, जाट, गुज्जर आणि राजपूत) समुदायाला गठित करून व्ही. पी. सिंह, देवी लाल आणि चंद्रशेखर यांच्या सोबतीने १९८९ मध्ये काँग्रेसच्या विरोधात आघाडी केली. बिगरकाँग्रेस सरकार यावं यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी भाजपसोबतही गेले. त्यावर स्पष्टीकरण देताना, तेव्हाची भाजप अटलबिहारींची होती. नैतिकता त्यांच्या जागी होती आणि लोकशाही मूल्यांचा त्यांनी स्वीकार केला होता असा युक्तिवाद ते करतात. आजची भाजप एकाधिकारशाही मानणारी आणि मनुवादी व्यवस्था आणण्यासाठी कार्यरत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांचे हे दोन्हीही युक्तिवाद कुठल्याही समंजस माणसाला पचनी पडणारे आहेत. या सगळ्या बेरीज वजाबाकी लक्षात घेता येणाऱ्या काळात शरद यादवांना त्यांच्या आयुष्याचा उतारवयातही मोठी संधी चालून येऊ शकते.


--प्रा. सागर भालेराव
  

आजवर रामाचं फार वाचलंत, आता रावणाचंही वाचा.

जेत्यांचा इतिहास कायम धवल असतो तर पराजितांचं इतिहास हा काळोखाच्या गर्तेत लुप्त झालेला असतो, हा झाला निसर्गनियम आणि सहजवाद!

भारताच्या इतिहासात आणि धार्मिक राजकारणात महत्वाचं स्थान असलेला 'नायक' म्हणून अयोद्धेयचा राजा राम आपल्याला ठाऊक आहे. अयोध्येचा राजा, सीतेचा पती, त्याच मर्यादापुरुषोत्तम असणं,शबरीची बोर खाणं,अहिल्येचा उद्धार करणं आणि महत्वाचं म्हणजे रावणाशी युद्ध करून आपल्या पत्नीला,सीतेला त्याच्या तावडीतून सोडून आणणं हे सगळे कर्तब आपल्याला ठाऊक आहेत,परिचयाचे आहेत.या प्रसंगावर महाकाव्य लिहिलं गेलं,रामायण! आजही ते वाचलं जातं. आजही या महाकाव्याचा आपल्या जीवनावर नाही म्हटलं तरी परिणाम हा दिसतोच. रामाच्या नावाचा वापर करून देशात काय राजकारण चालू आहे हे काही वेगळं सांगायला नको.


ही झाली रामाची बाजू. पण पराजित रावणाची बाजू आपण कधी वाचलीय का? आर्याच्या आक्रमणानंतर इथले द्रविड/अनार्य/असुर देशोधडीला लागले. निसर्गवादाचा पुरस्कार करणारे असुर एकाएकी असभ्य ठरवले गेले.सिव्हिलाइज्ड (स्वतःला म्हणवून घेणाऱ्या)आर्यांनी सांस्कृतिक दहशतवाद माजवला (आज चालू असलेली सांस्कृतिक राष्ट्रवादाची चर्चा हा त्याचाच  पुढील भाग).
जातिव्यवस्थेची नीचोत्तम प्रथा याच काळात सुरु झाली,यज्ञयाग,कर्मकांड,पशुबळी हे सगळं याच संस्कृतीचं आपत्य! वेदांच्या प्रचार-प्रसारासाठी वाट्टेल ते केलं गेलं.दिग्नाक-चार्वाक-बळी या परंपरेला संपवून टाकण्याचा प्रयत्न झाला.
याच दरम्यान असुरांची अनेक छोटी-मोठी साम्राज्यांनी दक्षिण भारतात आपली वेगळी ओळख निर्माण करत होती. देव लोकांशी त्यांचं कधीही जमलं नाही. जमण्याचा दुरान्वये संबंधसुद्धा नव्हता. कालांतराने देव लोक शिरजोर झाल्यावर कुबेराच्या सावत्र भावाने,रावणाने समस्त असुर समुदायाचं नेतृत्व करण्याचं ठरवलं आणि स्वतःच साम्राज्य उभं केलं. समस्त असुर समुदायाला विश्वास होता कि देव लोकांना नमविण्याची,झुकविण्याची पात्रता जर कुणाच्या अंगी आहे तर ती रावणाच्या अंगी आहे.त्यामुळेच भद्र सारखा साधारण युवक रावणाच्या दरबारी रुजू झाला (भद्र हा धोबी समुदायातील होता आणि त्याच्या 'त्या' कथित टिप्पणीने सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली अशी वदंता आहे). असुर या आनंद नीलकंठ लिखित पुस्तकात हाच भद्र रावणाच्या पराजयाची आणि रामाच्या कपटनीतीची कहाणी सांगतो. रावणाने उभं केलेलं साम्राज्य,त्याचा डौल,त्याचा मान-सन्मान,त्याची महत्वकांक्षा,त्याचा अहंकार हे सगळं त्यात मांडलं गेलंय. द्राविडी परंपरेत चालत आलेल्या मिथक कथांचा आणि मौखिक कथांचा त्याला आधार आहे.

प्रत्येक दसऱ्याला रावणाचं दहन केलं जात. या दहनाने रावण कुठे मरतो काय? तो आजही जिवंत आहे,आपल्या मनात,इतिहासाच्या पानापानात...

रावण आणि मंदोदरीला झालेल्या नवजात मुलीला पाहून एका साधूने भविष्यवाणी केली कि या मुलीमुळे असुर कुळाचा नाश होईल. असुर कुळाच्या भल्यासाठी या मुलीला जीवे मारण्याची जबाबदारी रावणाच्या नकळत त्याच्या शुभचिंतकांनी भद्रवर सोपविली. या मुलीला जीवे मारणे भद्रला जमले नाही. चिखलाच्या दलदलीत या मुलीला भद्रने फेकलं.पुढे ही मुलगी देव राजा जनकाला मिळाली आणि पुढे काय घडलं याची नाट्यमय कथा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला गेला हे जेव्हा रावणाला समजत, येथून खऱ्या अर्थाने रावणाची गाथा सुरु होते. महाबळीचं साम्राज्य वामनाने छल-कपटाने काबीज केलं. त्या महाबळीकडे रावणाने आपलं शिक्षण घेतलं. आपली मुलगी देवलोकात सुरक्षित नाही असं रावणाला वाटू लागत.  स्वयंवरासारखे अघोरी आणि महिलांच्या अधिकाराचे हनन करणारे प्रकार असुर समुदायात कधीही नव्हते.
पुढे आपल्या मुलीला,सीतेला परत मिळवण्याची रावणाची धडपड, रामाने युद्धकाळात वापरलेली अनीती, मंदोदरीसोबत वानरसेनेने केलेला बलात्कार,शंबुकाची रामाने केलेली हत्या  आणि मुख्य म्हणजे सीतेसोबत केलेला दुष्ट व्यवहार आपल्याला वैदिकांच्या अघोरी कृत्यांशी ओळख करून देतो आणि त्यांचा सांस्कृतिक दहशतवाद किती वर्षांपासून सुरु आहे याची प्रचितीहि देतो.

आजवर रामाचं फार वाचलंत, आता रावणाचंही वाचा.
उत्तरेकडे घराघरात रामाची मंदिरं आहेत हे माहिती आहेच,पण दक्षिणेत रावणाला आजही पुजलं जातं याकडेही  दुर्लक्ष करता कामा नये. दक्षिणेत ओणम साजरा करताना आजही महाबलीची आरती केली जाते हेही विसरता कामा नये. एवढंच काय, महाराष्ट्रात भाऊबीजेला भावाला ओवाळताना बहीण 'ईडा-पीडा जावो,बळीच राज्य येवो' असं म्हणते तेव्हा त्या मागे हा सगळा इतिहास असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.आपल्या देशात अनेक आदिवासी जमाती आजही महिषासुराची पूजा करतात हेही सत्य नाकारून चालणार नाही .  याचाच परिपाक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'रिडल्स इन हिंदुजम'हे पुस्तक लिहिलं आणि रामराज्यावर खरडून टीका केली,ताशेरे ओढले. सत्य कितीही झाकून ठेवलं तरी ते कितीवेळ लपून राहणार?

'असुर' हा पुस्तक नक्की वाचा आणि सत्याच्या शोधयात्रेत सामील व्हा!