जनकवी - शैलेंद्र कुमार

जनकवी - शैलेंद्र कुमार

३० ऑगस्टला जनकवी शैलेंद्र कुमार यांची जयंती आपण साजरी केली. त्यानिमित्ताने केलेला हा लेखनप्रपंच. 

लहानपणापासून आपण त्यांची गाणी ऐकत आलो आहोत. अंताक्षरी खेळताना त्यांनी लिहिलेली सिनेमातील गाणी आपण गातो, पण ही गाणी लिहिणारा हा कवी कोण हे आपल्याला माहीत नसतं. तुम्ही 'आवारा हु, या गर्दीश में आसमान का तारा हूँ', 'बरसात में हमको मिले तुम सजन, तुमसे मिले हम',  'मेरा जूता है जापानी' ही सगळी गाणी आपण कधी ना कधी ऐकली असतील, आजही ऐकत असाल. ही एकाहून एक सर्रास गाणी लिहिणारा कवी म्हणजे शैलेंद्र कुमार. रावळपिंडीतल्या एका दलित कुटुंबात जन्माला आलेले शैलेंद्र पोटापाण्यासाठी मथुरा येथे स्थायिक झाले. पुढे नोकरीनिमित्त परेलच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये कामाला लागले. मुंबईत खऱ्या अर्थाने त्यांची प्रतिभा फुलली-फळली. पुढे कामगार चळवळीत डाव्या विचारधारेने प्रभावित होऊन त्यांनी 'इप्टा' मध्ये आपला राबता वाढवला. आपल्या कवितांमधून सामाजिक विचार आणि वर्गसंघर्षाची ठिणगी पेटवण्याचं काम त्यांनी केलं. इप्टाच्या एका संमेलनात  'जलता है पंजाब' नावाची त्यांची कविता राज कपूर यांनी ऐकली आणि त्यांना सिनेसृष्टीसाठी एक कोहिनूर सापडला. त्यावेळी राज कपूर 'बरसात' च्या चित्रीकरणात व्यस्त होते. बरसात  चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची विचारणा राज कपूरांनी त्यांना केली. सिनेगीत लिहिण्यासाठी शैलेंद्र कुमारांनी त्यांना नकार दिला.पुढे आर्थिक चणचण भासल्यावर त्यांनी राज कपूरची भेट घेतली आणि बरसातसाठी गाणी लिहिण्याची तयारी दर्शवली. त्यांनी लिहिलेल 'बरसात में हमको मिले तुम' हे गाणं सुपरहिट ठरलं. कुणा चित्रपटासाठी टायटल सॉंग लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याच संपूर्ण श्रेय शैलेंद्र कुमार यांचंच. येथून शैलेंद्र यांची हिंदी चित्रपटसृष्टीत कारकीर्द सुरु झाली. 
'आवारा हूँ' हे गाणं देखील तसंच गाजलं. नोबेल पुरस्कृत रशियन लेखक ऍलेक्सझंडार सोल्जेनिट्स यांनी आपल्या 'केन्सर वार्ड' या पुस्तकात सदर गाण्याचा सन्मानपूर्वक उल्लेख केला. आवारा सिनेमा जेव्हा फ्रांसमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील गाणी ऐकून वन्स मोअरच्या आवाजाने सभागृह दणाणलं होतं. खचितच इतकी प्रसिद्धी कुण्या हिंदी गाण्याला परकीय भूमीवर मिळाली असेल. याच पद्धतीने 'श्री 
४२०' मधील 'मेरा जुता है जापानी' या गीताला हॉलिवूडने केलेल्या एका सर्वेक्षणात सर्वश्रेष्ठ गीतांच्या यादीत स्थान दिले आहे.आजवरचे हे एकमेव उदाहरण ठरले आहे. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला 'बूट पॉलिश' हा सिनेमा देखील अतिशय गाजला. त्यात शैलेंद्र यांनी 'नन्हें मुन्ने बच्चे 'तेरी मुठ्ठी में क्या है' हे गाणं लिहिलं. प्रश्नोत्तर शैलीत लिहिलेलं हे पहिलं गीत ठरलं. 
१९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मासूम' या चित्रपटासाठी त्यांनी एक गीत लिहिलं. आजही हे बालगीत घराघरात गायलं जात. गीत होतं,
नानी तेरे मोरनी को मोर ले गये 
बाकी जो बचा था काले चोर ले गये 
बालगीतांपासून चळवळीच्या गीतांपर्यंत सर्वांगी लिहिणारा हा कवी एक अजब रसायन होता. 
लोकप्रियता आणि उत्कृष्टता यांचा नितांत सुंदर आविष्कार साधण्यात ज्या फार कमी कवींना यश प्राप्त झालंय,त्यात शैलेंद्र कुमारांचं नाव सगळ्यात पुढे आहे. साध्यासोप्या अभिव्यक्तीचा आविष्कार आपल्याला त्यांच्या गीतांमधुन पाहायला, अनुभवायला मिळतो. आपल्या रचनेत सामान्य माणसाला चितारण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्या कविता सरळ तुमच्याशी संवाद साधतात. त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला कुणा प्राध्यापकाची, विश्लेषकाची गरज नाही. कदाचित त्यामुळेच समीक्षकांनी या जनकवीकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही. त्याबाबतीत त्यांची उपेक्षाच केली गेली. परंतु साहित्यसेवेने समाजसेवा केली जाऊ शकते याचं उदाहरण त्यांनी भारतीय समाजला घालून दिल. 
१९४२ च्या लढ्यात गांधी विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.त्यात त्यांना अटकही झाली. परंतु स्वतंत्रप्राप्ती नंतर बदलत्या स्थित्यंतरावर ते नाराज होते. गोरे साहेब जाऊन काळे साहेब आले अशीच त्यांची धारणा होती. कामगार चळवळीत सक्रिय असलेल्या शैलेन्द्रांनी चळवळीची गाणी लिहिली. 'हर जोर जुलूम कि टक्कर में, संघर्ष हमारा नारा है' हा वापरला जाणारा नारा शैलेंद्र यांचीच रचना आहे.आंदोलनात आपलं मनोबल वाढविणारा हा नारा कुणी लिहिला याची चळवळीतल्या फार कमी लोकांना कल्पना असेल. त्यांची गीतं लोकगीतं का बनली याचं स्पष्टीकरण आपल्याला या उदाहरणातून मिळतं. साधी सरळ रचना हे त्यामागचं कारण आहे.१९५५ मध्ये त्यांचा 'न्योता और चुनौती' हा कवितासंग्रह प्रकाशित केला गेला. त्यांचा हा एकमेव कवितासंग्रह त्यांनी कॉ. अण्णाभाऊ साठेंना समर्पित केला.
चित्रपटांसाठी लिहिलेल्या गाण्यांमधूनही साम्यवादी विचार प्रदर्शित करण्याचा त्यांचा हेतू असायचा. खालील उदाहरणांवरून आपल्याला त्याची कल्पना येईल. 

पंडित जी मंतर पढ़ते है 
वो गंगा जी नहलाते है 
हम पेट का मंतर पढ़ते है 
जूते का मुँह चमकाते है 
पंडितजी की पांच चवन्नी है 
अपनी तो एक इकन्नी है 
फिर भेदभाव ये कैसा है 
जब सब को प्यारा पैसा है  {बूट पॉलिश} 

तत्कालीन समाजव्यवस्थेचं चित्रण करताना ब्राम्हणवादावर शैलेंद्र कुमार टिका करताना दिसतात. 

रात दिन हर घडी एक सवाल 
रोटी कम है क्यों अकाल 
क्यों दुनिया में कमी है 
ये चोरी किसने की है 
कहाँ है सारा माल 
कहाँ है सारा माल {छोटी बहन}

वामनदादा कर्डक यांच्या 'सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो' या गाण्याशी भावार्थ सांगणार हे गीत चळवळीतल गीत वाटावं असच आहे. सिनेमांच्या गीतातही वैचारिक लिखाण करणारे शैलेन्द्र कुमार म्हणून तर इतर कवींच्या तुलनेत वेगळे आहेत. 
आज या पद्धतीने समाजव्यवस्थेच चित्रण करणारा कवी असता तर नक्कीच 'अर्बन नक्षलवादी' ठरला असता. आपल्या गीतांमधून राजव्यवस्थेला प्रश्न विचारणारा हा कवी लिहितो, 

'भगतसिंग इस बार न लेना काया भारतवासी की, 
देशभक्ति के लिए आज भी सजा मिलेगी फांसी की' 

भगतसिंगला या देशात पुन्हा जन्म घेऊ नको, अन्यथा देशद्रोही ठरवला जाशील असा सल्ला देणारा हा जनकवी खऱ्या अर्थाने जनतेचा, शोषितांचा आणि वंचितांचा आवाज होता. मुख्य प्रवाहातील समीक्षकांनी त्याला दुर्लक्षित केलं पण जनतेच्या मनात हा जनकवी आजही आपलं अढळ स्थान अबाधित ठेऊन आहे. 

No comments:

Post a Comment