पुरोगामी चळवळीला ब्राम्हणत्व सोडावेच लागेल!

पुण्यात कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार समितीचा पानसरे यांच्या नावाचा  पहिला पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांना डॉ. रावसाहेब  कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात रावसाहेब कसबे यांनी केलेल्या भाषणावर महाराष्ट्रात भरपूर चर्चा सुरु आहे. आपल्या परखड मांडणीसाठी कसबे प्रसिध्द आहेत. कालसुसंगत मांडणी हे त्यांच्या अभ्यासाचे वैशिष्ट्य आहे,म्हणून तर त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिरफाड करणारे "झोत" हे पुस्तक आल्यानंतर संघाला त्याची दखल घेणे भाग पडले. दलित चळवळीने आजवर अकारण ब्राम्हणद्वेष केला म्हणून पुरोगामी चळवळीची अधोगती झाली असे मत त्यांनी मांडले.ब्राम्हणद्वेष करताना पुरोगामी चळवळीनेही ब्राम्हणत्व घेतले असे कसबे म्हणतात. रावसाहेब कसबेंच्या म्हणण्याचा अन्वयार्थ लक्षात घेतला आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवली तर त्यांना काय म्हणायचे आहे हे लक्षात येईल. ब्राम्हणत्वाविरोधातला भारतीय समाजातील संघर्ष हा काही कालपर्वाचा नाही.बुद्ध धम्म, लोकायत चळवळ, सत्यशोधक समाज अशी मोठी संघर्षयात्री परंपरा या लढयाला आहे. आधुनिक भारतात याबद्दल सर्वात प्रकर्षाने जर कोणी काम केले असेल तर ते महात्मा जोतीबा फुले यांनी केले आहे. या सगळ्याचा सर्वार्थाने विचार करावयाचा झाला तर महात्मा फुलेंची  विचारसरणी अगोदर  समजून घ्यावी लागेल,कारण याच विचारसरणीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपला लढा उभा करतात आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुध्ह बंड पुकारतात.  १९ व्या शतकाच्या सुरुवातीला प्रबोधनाचा विचार समाजातील सर्व क्षेत्रात मुळ धरू पाहत होता. धर्मसंस्थेचे सर्व क्षेत्रांवर नियंत्रण असल्यामुळे धर्मसुधारणेच्या क्षेत्रात मोठी धामधूम चालली होती. विवेकवाद, तर्कनिष्ठपणा आणि सद्सद्विवेकबुद्धीवर आधारित आधुनिक युगाला साजेशी अशी धर्मचिकित्सा करण्याचा प्रयत्न तत्कालीन सर्वच समाजसुधारकांनी केला. पैकी काही बोलके सुधारक होते आणि काही कर्ते सुधारक होते. धर्माच्या चौकटीत राहून धर्मसुधारणा करणारे बोलके सुधारक आणि धर्माच्या भिंती गदागदा हलवून ती खीळखिळी करण्याचा चंग बांधलेले कर्ते सुधारक, पैकी  महात्मा फुलेंचे विचार आणि बोलके सुधारक असलेल्यांचे विचार कधीही एक झाले नाही, आणि त्यामागे सामाजिक परिस्थितीही तितक्याच जबाबदार होत्या. सनातनी व्यवस्थेच्या विरुध्द दंड थोपटणे आणि त्यांना आव्हान देण्याचे बळ ब्राम्हण सुधाराकांपाशी नव्हते, ते विद्रोह ज्यांचा स्थायी भाव आहे त्या महात्मा फुलेंच्यापाशी  बघायला मिळते. महात्मा फुले देखील त्यांच्या संपूर्ण संघर्षात ब्राम्हण आणि ब्राम्हणत्व यात फरक करतात. आपल्या एका लेखात ते म्हणतात, "ऐदी ब्राम्हणाला जेवायला घातले असता जेवढे पाप लागेल, त्यापेक्षा शेकडोपट पुण्य कष्टकरी मजुराला जेवू घातले तर मिळते".कर्मावर विश्वास असणारे महात्मा फुले  येथे "ऐदी"हा शब्द वापरतात, सरसकट सर्व ब्राम्हण मंडळींना ते आरोपिच्या पिंजऱ्यात उभे करत नाहीत. (सीताराम रायकर- आम्ही पाहिलेली फुले,१९८१).

 पुरोहीतशाही, धर्मसंस्था, शोषणव्यवस्था या सगळ्यांमधून अस्पृश्य आणि शुद्रातिशुद्रांचे कसे शोषण केले जाते हे वेळोवेळी महात्मा फुले यांनी आपल्या भाषणातून, लेखातून सांगितले आहे. जातीच्या व्यवस्थात्मक चिकित्सेला विकसित करून तिला पुढच्या टप्प्यावर नेवून ठेवण्याचा प्रयत्न पुढे प्रत्येक समाजसुधारकाने केलेला आढळतो.त्यामुळे  जातीसंघार्षाला एक दिशा  मिळत गेली आणि विद्रोहाला सामाजिक आणि सिद्धान्तिक पाया मिळत गेला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सत्यशोधक समाजाच्या आणि दलितांच्या समग्र चळवळीला जोतिबांच्या जातीखंडणाचा विचार सातत्याने मार्गदर्शन करणारा ठरला आहे. जातिव्यवस्थेचा कोणताही संघर्ष हा ब्राम्हणी धर्माच्या चिकित्सेशिवाय होऊ शकत नव्हता, किंबहुना ब्राम्हणी धर्माच्या चिकित्सेतून जाती व्यवस्थेविरुध्द बंड करण्याची सुरुवात होती. आपल्या पहिल्या कृतीपासून ते अगदी शेवटपर्यंत  संत बसवेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार स्वामी हे ब्राम्हणी धर्माची चिकित्सा करताना दिसतात.आजपर्यंत वेदप्रामाण्य हे ब्राम्हणी धर्माचे मध्यवर्ती सूत्र राहिलेले आहे. वेद हे देवलीखीत असल्याने त्याला बदलता येणार नाही अशा ब्राम्हणांच्या भूमिकेमुळे त्याची चिकित्सा कित्येक शतके झाली नव्हती, ती परंपरा मोडीत काढत स्री-पुरुष विषमता, स्री दास्य, अस्पृश्यता यांना कारणीभूत असलेले वेद नाकारण्याचे धाडस आपल्या समाजसुधारकांनी केलेले आढळते. महात्मा फुल्यांनी चालू केलेली  ही सत्यशोधक चळवळ पुढे अब्राम्हनी परंपरेचे तात्त्विक अधिष्ठान प्रकट करत होती. पितृसत्ताक समाजव्यवस्था, स्री दास्य, वेद्विरोध, जाती निर्मुलन या तत्वांच्या आधारे संस्कृती मीमांसा करून महात्मा फुल्यांनी ब्राम्हणी धर्म आणि संस्कृतीला नकार दिला आणि भारतातील जाती-संघर्षाच्या परंपरेत लोक संस्कृतीच्या सहाय्याने धर्मतत्वांची मांडणी केली.(उमेश बागडे-महाराष्ट्रातील प्रबोधन आणि वर्गजातीप्रभूत्व,२००६). 

ब्राम्हणी धर्माच्या प्रभावाखाली आपले जीवन जगणाऱ्या, गुलामी भोगणाऱ्या शुद्रातीशुद्रांना प्रबोधन करून त्यांना जातीव्यवस्थेच्या विरोधात संघटीत करण्यासाठी संस्थात्मक पाया असावा यासाठी महात्मा  फुल्यांनी १८७३ साली  सत्यशोधक समाजाची स्थापन केली.ब्राम्हणत्वाविरोधात असलेली ही चळवळ सर्व समुद्यासाठी खुली होती. त्यात जसा महार,मांग, ज्यू, मुसलमान, मराठा,माळी यांना प्रवेश होता तसाच ब्राम्हनांनाही यात प्रवेश होता. ( सीताराम रायकर, आम्ही पाहिलेली फुले, १९९८१) यावरून महात्मा फुल्यांच्या संदर्भाने ब्राम्हणांना शिव्या देणाऱ्यांनी बोध घेतला तर त्यांच्या हिताचेच आहे. महात्मा फुल्यांच्या समकालीन असलेल्या अनेक समाजसुधारकांनीही आपल्या आपल्या पद्धतीने काम सुरु केले होते. ब्राम्हण सुधारकांच्या दुटप्पी आणि चौकटीत राहून सुधारणा करण्याच्या वृत्तीवर महात्मा   फुले कडाडून टीका करतात, असे असले तरी त्यांचे समकालीन समाजसुधारकांशी  जिव्हाळ्याचे संबंध पाहायला मिळतात.त्यांच्या करणी आणि कथनी मधला फरक जाहीरपणे महात्मा फुले बोलून दाखवतात .परंतु, असे असले तरी वेळ पडेल तेव्हा या सुधारकांच्या बाजूनेही उभे राहतात. म्हणूनच तर वेद्व्यवस्था मानणारे आणि वेदाचे कट्टर समर्थक असलेले परंतु ब्राम्हणी पौराहित्य आणि कर्मकांडाला विरोध करणारे  स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यात मिरवणूक निघते आणि जेव्हा सनातनी लोक त्याला विरोध करतात तेव्हा वैचारिक मतभेद असूनही महात्मा फुले या मिरवणुकीत लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या सोबत सामील  होतात.(पंढरीनाथ पाटील-महात्मा जोतीराव फुले, २००५). 

आपल्या सत्यशोधक समाजाद्वारे सत्य शुद्रातीशुद्रांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि माणसाला माणूस म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचे ब्राम्हणेत्तर चळवळीत झालेले रुपांतर घातक ठरले. वैश्विक भाषा करण्याच्या काळात ब्राम्हण विरुध्द ब्राम्हणेत्तर असा वाद पुढे निर्माण झाला, आणि त्यापुढे जातीद्वेषाचे राजकारण सुरु झाले. समाजातील ब्राम्हणांच्या सर्वंकष वर्चस्वाला विरोध करून बहुजन समाजाची उन्नती आणि प्रगती करणे या उद्देशाने महाराष्ट्रात सुरु झालेली चळवळ नंतर देशी आणि विदेशी मुद्ययांवर संघर्ष करायला  लागली. २० व्या शतकातील ब्राम्हणेत्तर चळवळीच्या ज्या पुढाऱ्यांनी महात्मा फुल्यांचे अनुकरण केले त्या फुल्यांच्या विचारसरणीत वर्गीय किंवा वर्णीय अभिनिवेश अभिप्रेत नव्हता. पुढे महर्षी शिंदे यांनी मात्र महात्मा फुल्यांचे विचार आत्मसात करून " डिप्रेस्ड क्लास मिशन" मार्फत अस्पृश्यांना मोफत शिक्षण पुरविले.हे करताना त्यांनी कुठल्याही जातीचा अभिनिवेश दिसू दिला नाही, आपणही अगदी करंटेपणा महर्षी  शिंदे  यांचे कार्य अनुल्लेखाने टाळले. फुले-शाहू- आंबेडकर यांच्या परंपरेत असलेले महर्षी  शिंदे  यांना आपण नाकारले हे ब्राम्हणेत्तर चळवळीचे अपयश मानावे लागेल.जातिव्यवस्थेच्या संघर्षातील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यांच्या न्यायहक्कासाठी असलेला लढा. महात्मा फुल्यांचा आदर्श घेवून आणि त्यांना गुरु मानून बाबासाहेबांनी आपला लढा उभा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि,भारताच्या सर्वांगीण प्रगती मार्गातील मोठा अडसर, तसेच मनुष्यबळाचा पूर्णतः उपयुक्ततेवरील मर्यादा म्हणून जातीव्यवस्था वर्षानुवर्षे उभी आहे. अस्पृश्यतेचे निराकरण करण्यासाठी जातीसंस्थेचे उच्चाटन आणि त्यासाठी जातीसंस्थेला आधारभूत ठरलेल्या धार्मिक सांस्कृतिक मूल्यांचे व परंपराचे विच्छेदन करणे गरजेचे आहे. धार्मिक मुल्ये ब्राम्हणी संस्कृतीतून आली असल्याकारणाने थेट त्या व्यवस्थेला हादरा देण्याचा यशस्वी प्रयत्न बाबासाहेबांनी केला. चवदार तळ्याच्या सत्याग्रह प्रसंगी आपल्या ब्राम्हण सहकाऱ्यांना सोबत घेऊ नये, ही ब्राम्हण मंडळी सत्याग्रहात सहभागी  असल्यास आम्ही आपल्या सत्याग्रहाला पाठींबा देणार नाही आणि सहभागी होणार  नाही अशी मागणी जेधे -जवळकर या ब्राम्हणेतर मंडळींनी केली. त्यांच्या या मागणीला धुडकावून लावत, बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिले कि माझा विरोध हा ब्राम्हण जातीला नसून ब्राम्हण प्रवृत्तीला आहे. या प्रसंगावरून बाबासाहेबांचा उदार दुष्टीकोन लक्षात यावा. (भा.ल. भोळे- बाबासाहेबांचा वैचारिक वारसा,१९९८). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवी हक्कासाठी असलेला लढा, मनुष्याला मनुष्य म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा महात्मा जोतीराव फुले यांच्या मार्गावरील प्रवास त्यांच्या पश्चात जातीचा अभिनिवेश करणारा ठरला. ब्राम्हण्यवादाला विरोध करता करता चळवळीच्या नेत्यांनी सरसकट सर्व ब्राम्हणांना धरून धोपटायला सुरुवात केली. ज्यांनी जातीअंताच्या लढाईसाठी लढणे अभेप्रीत होते तेच पुन्हा जातीच्या आधारे आपली आपली दुकाने चालवू लागली.यामागे राजकीय सुप्त इच्छा देखील होत्या हे विसरता कामा नये. परंतु असे होत असताना, आपल्या महापुरुषांचा पराभव आपणच करत आहोत याची थोडीसुद्धा कल्पना आपल्याला न यावी याचे दुखः आहे. दलितांच्या हक्कासाठी निडर अशी दलित प्यान्थर १९७२ साली जन्माला आली. ३३ कोटी देवांवर थुंकून ज्यांची कार्यक्रमाला सुरुवात व्हायची अशा दलित प्यान्थरला सुद्धा जातीअंताच्या संघर्षात यश आले नाही, या मागे एकमेव कारण होते ते म्हणजे सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा आभाव. म्हणून, पदमश्री नामदेव ढसाळ हे  कवी अनंत फंदी व्याख्यानमालेत बोलताना,आम्ही  विनाकारण हिंदु संस्कृतीला  शिव्या दिल्या, ही आमची सर्वात मोठी चूक होती आणि ती पुढच्या  पिढीकडून घडू नये असे जाहीरपणे काबुल करतात. विद्वेषाच राजकारण मग ते पुरोगाम्यांच असो वा प्रतीगाम्यांचे, ते वाईटच!

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेवून संभाजी ब्रिगेड, बामसेफ सारख्या संघटना जातीद्वेष आणि वंशद्वेष पसरवत आहेत, हे मात्र स्वतः त्या महापुरुषांनाही मान्य झाले नसते. आरएसएस सारख्या हिंदू मुलतत्ववादी विचारधारा असलेल्या संघटनांचे जेवढे विखारी आणि वंशवादावर आधारित साहित्य आज बाजारात उपलब्ध नसेल तेवढे बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची वंशवादावर आधारित साहित्य सध्या उपलब्ध आहे. संविधानाची कवचकुंडले देवून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना या देशाचे सार्वभौम नागरिक म्हणून अधिकार दिले, किमान संविधानाच्या मुल्यांचा स्वीकार जरी केला असता तरी स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या या संघटनांना आपल्या कार्यात यश आले असते.कारण, संविधान म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून बाबासाहेब आंबेडकरांची विचारप्रणाली आहे.वैश्विक खेड्याची संकल्पना सगळीकडे मान्यता पावत असताना आपण पुन्हा टोळी संस्कृतीकडे जातो आहोत असे साधारण चित्र सध्या आपल्या आजूबाजूला आहे. भगविकरणाचे सार्वत्रीकरण होताना आणि आपला देश मुलतत्ववादी मानसिकतेतून जात असताना इथल्या पुरोगामी चळवळीने तरी किमान नेटका लढा दिला पाहिजे. आंबेडकरी चळवळीत देखील ब्राम्हणत्व असणारे लोक आहेत,पैकी सामाजिक चळवळीला दिशा देणारे आणि ब्राम्हणत्व नसलेले मोजके लोक अजूनही आपल्या आपल्या मार्गाने सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे काम करत आहेत. पैकी एक असलेले रावसाहेब कसबे हे असाच दूरगामी  विचार सांगणारे विचारवंत आहेत. त्यांच्या भाषणातून येणाऱ्या काळाची      चाहूल दिसते आहे. ती वेळीच ओळखली पाहिजे.त्यांनी  म्हटल्याप्रमाणे ब्राम्हणांनी ब्राम्हणत्व सोडले आणि दलितांनी ते घेतले असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. ब्राम्हणत्व हे वर्चस्ववाद सांगते, आणि जिथे जिथे वर्चस्ववाद आहे तिथे तिथे संघर्ष आहे हा आजवरचा इतिहास आहे.संघर्ष टाळायचा असेल तर त्यासाठी ब्राम्हणत्व जसे ब्राम्हणांनी सोडणे गरजेचे आहे तसेच ते पुरोगामी चळवळीने सोडणेही तेवढेच निकडीचे आहे. नाही तर येणारा काळ संघर्षाने भरलेला असेल.


इंजी. सागर भालेराव 
९५९५८४२२३८

संवेदना बधिर होत चाललेल्या वर्तमानाची कहाणी-नागरिक

माझा जन्म झाला तो मुळात कोकणातल्या एक छोट्या गावात. नोकरी निमित्ताने आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मुंबई गाठली. मुंबई जशी सगळ्यांना सामावून घेते, तशीच या मुंबापुरीने मला सामावून घेण्यातही कुठलीही अस्पृश्यता पाळली नाही. सुरुवातील पत्रकार म्हणूनच मी आपल्या करियरला सुरुवात केली. पत्रकारितेत आल्यावर वरवर दिसणाऱ्या गोष्टी या किती खोलवर असतात हे समजायला लागलं. १९९३ साली जाहलेली दंगल स्वतः अनुभवली, स्वतःच्या डोळ्यादेखत माणस मरताना आणि मारताना पाहिली. जोगेश्वरीची राधाबाई चाळ  धगधगत्या आगीत माणस कवेत घेताना पाहिली. घाटकोपरची रमाबाई आंबेडकर कॉलनी देखील अशीच आक्रोश करत धगधगताना पाहिली. गिरणी कामगारांचे मोठेमोठे मोर्चे आंदोलन पाहिली आणि त्यांना दडपू बघणाऱ्या मोठ्यामोठ्या शक्ती देखील बघितल्या. ह्या शक्ती कधी निव्वळ  राजकीय होत्या, तर कधी भांडवदारी व्यवस्था आपल्या वळचणीला बांधून ठेवलेले  समाजकारणी यात होत्या. दंगल रेग्युलेट करणारी माणस पहिल्यांदाच पाहत होतो. खर तर दंगल पेटवायची कधी आणि शांत कधी करायची, किती दिवस धगधगती ठेवायची  याच मेक्यानिजम असत हे पहिल्यांदा कळाल. दंगलीच शास्रशुद्ध काम राजकारणी माणसे कशी करतात याच भयाण वास्तव देखील जाणवलं. सामाजिक रंग बेरंग करण्यासाठी राजकारणी माणसे कोणत्या थराला पोहचू शकतात आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी सामान्य नागरिकांचे किती शोषण करू शकतात हे प्रत्यक्ष पाहत होतो, अनुभवत होतो. अनुभवातून, आकलनातून आणि जाणिवांच्या प्रवासातून मग एक कलाकृती डोक्यात घरघर करत होती, आणि ही कलाकृती २००३  साली पहिल्यांदा  अक्षर दिवाळी अंकात छापून आली, तिचे नाव म्हणजे माझी पाहिली वाहिली कादंबरी "नागरिक"!
मी काही कादंबरीकार नाही किंवा बडा लेखक वैगेरे नाही. अनुभवातून जे जे काही आल ते उतरविण्याचा प्रयत्न मी या कादंबरीत केला आहे. एका मराठवाड्यातील  दलित कुटुंबातून आलेला शाम जगदाळे हा तत्वनिष्ठ पत्रकार आपली तत्वे जपत,सामाजिक भावना जागृत ठेवत मुंबईत पत्रकारिता करत असतो. पत्रकारिता करत असताना त्याला राजकारणी, माध्यमे, भांडवलदार हे सगळे आपल्या फायद्यासाठी सामान्य नागरिकाचा कसा बळी घेतात हे जाणवते. शाम जगदाळेला बऱ्याच वेळा आमिषेही  दाखवली जातात, परंतु तत्वाशी तडजोड न करणारा शाम या आमिषाला बळी पडत नाही आणि प्रसंगी नोकरीवर लाथही मारतो. समाजात बदल घडवू पाहणारी आंदोलने बघतो आणि ही आंदोलने मोडीत काढणारी व्यवस्थाही बघतो, बुवाबाजी-नरबळी प्रकारही बघतो आणि त्यांना शरण जाणारे धर्मांधही बघतो. जातीपातीच्या आधारावर राजकारण करणारी बडी मंडळी, आणि त्यांचे लागेबांधे असणारे व्यावसायिक यांच्यात शाम वावरतो. समाजातला हा संघर्ष पाहुन शाम हतबल होत नाही तर नव्या उमेदीने स्वतःचे दैनिक चालू करतो आणि आपला लढा चालूच ठेवतो. असे या कादंबरीचे एकूण कथानक आहे.२००३ साली अक्षर दिवाळी अंकात याबद्दल छापून आल्यानंतर मला पहिल्यांदा माझा मित्र कवी आणि अभिनेता सौमित्र याचा फोन आला.  तो कुठे तरी नाशिकच्या आसपास आपल्या चित्रपटाच शुटींग करण्यात व्यस्त होता.त्याने सुचवले कि ही कादंबरी प्रकाशित कर. इतर मित्रांचाही आग्रह वाढल्यावर २००६ साली डिम्पल पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली. एव्हाना या कादंबरीची भरपूर चर्चा व्हायला लागली.कादंबरी प्रकाशित व्हायच्या अगोदरच सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या. मुळात ही  कादंबरीच मला नवी असल्याने, सिनेमाबद्दल कुठला विचारही नव्हता. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांनी, निर्मात्यांनी संपर्क केला. परंतु, मी काही तयार नव्हतो. त्याच दरम्यान अमेरिकेत असलेल्या जयप्रद देसाई या तरुण दिग्दर्शकाला "नागरिक" ही कादंबरी वाचण्यात आली. २००८ मध्ये त्याने कादंबरी वाचल्यावाचल्या लागलीच मला ई-मेल पाठवला     आणि या कादंबरीवर आधारित सिनेमा काढण्याचा विचार असल्याचे सांगितले. जयप्रद देसाई आणि माझी याअगोदर काही ओळख नव्हती, त्याने अगोदर शोर्ट फिल्म केलेल्या होत्या एवढाच काय तो त्याचा अनुभव होता. नागरिक ही कादंबरी सामाजिक-राजकीय आशयावर असल्यामुळे जयप्रद सारखा नवखा दिग्दर्शक हे उत्तमरीत्या करेल कि नाही अशी धाकधूक होती. जयप्रद देसाईने सांगितले कि तुम्ही जर सिनेमा करण्यास उत्सुक असाल तर मी अमेरिका सोडतो. माझ्या कादंबरीवर सिनेमा काढण्यासाठी एक मुलगा अमेरिका सोडून भारतात येण्याचा विचार करतो आहे याचे मलाही नवल वाटले. ही सगळी प्रक्रिया चालू असतानाच २००९ साली निर्माते सचिन चव्हाण यांनी मला या कादंबरीवर आधारित असलेल्या सिनेमासाठी साईन केलं, आणि सरतेशेवटी "नागरिक" बनवण्यासाठी जयप्रद भारतात आला. २००९ ते २०१४ आम्ही चित्रपटाच्या पटकथेवर आणि संवादावर काम केले. चित्रपटाचे सगळे संवाद मी स्वतः लिहिलेले आहेत. यात लिहिलेले संवाद हे काही हवेतून आलेले नाहीत, आपण रोज बोलतो असे संवाद आहे.सहज आहेत म्हणून ते तीव्र आहेत.त्यामुळेच या चित्रपटाच्या संवादाला उत्कृष्ट संवादाचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळू शकला.लेखक समाजाभिमुक जर असला तर त्याच प्रतिबिंब हे त्याच्या लिखाणात पडत असत.माझही असच झाल, सामाजिक जाणीव घेवून घडलो असल्याकारणाने समाजाच नितळ प्रतिबिंब दाखविण्यास मी यशस्वी ठरलो. संवेदना बधिर होत चाललेल्या वर्तमानाची ही कहाणी आहे तसाच हा  सिनेमा भविष्यावरही भाष्य करतो. काळ आपल्या हातातून निसटतो आहे. जाताना आपल्या हाती अनुभव मात्र देवून जातो. देशातल्या प्रत्येक नागरिकाला इथल्या घटनेने काही अधिकार आणि कर्तव्ये दिलेली आहेत. आपले अधिकार आपण उपभोगत असताना आपल्याकडून अपेक्षित असलेली कर्तव्ये पार पडली जातात कि नाही याची दखल आपण घेतली पाहिजे. घटनेने दिलेले अधिकार आणि हक्क ज्या प्रकारे एका सामान्य नागरिकाला असतात तशीच ती एका पत्रकारालाही असतात. लोकशाहीचा चौथा खांब अशी बिरुदावली मिरवीत असलेला पत्रकार हा देखील एक नागरिकच आहे हे विसरता कामा नये. परंतु सध्याच्या काळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, पत्रकार आता लोकशाहीचा चौथा काय, कुठलाही खांब राहिलेला नाही. सामान्य नागरिकांच्या सगळ्या अपेक्षा माध्यमांनी धुळीस मिळविल्या आहेत. असे असले तरीही मूल्याधिष्ठित समाजरचनेची स्वप्ने बघणारी आणि तत्वनिष्ठ असलेली शाम जगदाळे सारखी पत्रकार मंडळी आपल्या समाजात आजही आहेत हे नाकारूनही चालणार नाही. आजपर्यंतचा सामान्य नागरिकांचा समज होता कि वृत्तपत्रांचे संपादक हे गुणवत्तेवर निवडले जातात, परंतु वास्तव असे आहे कि सद्यकाळात संपादक हे गुणवत्तेवर निवडले न जाता, राजकारण्यांच्या शिफारशीने भरली जातात. जरुरीपुरती निर्भीडता आजच्या सर्वच आघाडीच्या वृत्तपत्रांच्या संपादकानामध्ये पाहायला मिळते, असे माझे परखड मत आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने कादंबरीचीही भरपूर चर्चा झाली. काही लोक या चित्रपटाची तुलना "सिंहासन" या चित्रपटाशीही करतात.पण हे समजून घ्यायला हवे कि या दोन संपूर्ण वेगवेगळ्या कलाकृती आहेत आणि वेगवेगळ्या संदर्भासहित आहेत. सिंहासनमध्ये निळु फुले यांनी साकारलेला पत्रकार हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी नाही, त्यात सत्ता ही केंद्रस्थानी दाखवलेली आहे. परंतु, नागरिक या चित्रपटात संपूर्ण कथानक हे पत्रकार असलेल्या शाम जगदाळे भोवती फिरते. त्यामुळे या चित्रपटाची तुलना इतर चित्रपटांशी केल्यास ती 'नागरिक" वर अन्याय ठरेल.
सध्याची माध्यमांची स्थिती पाहता सामान्य नागरिकांनी मोठ्या हितसंबंध जपणाऱ्या माध्यमांना नाकारून छोट्या छोट्या वृत्तपत्रांना बळ द्यायला हवे. आताच्या काळात नवनिर्मितीसाठी ही छोटीछोटी माध्यमे उपयोगी पडतील. गांधी-फुले-आगरकर-आंबेडकर यांनी चालविलेली पत्रकारिता आताच्या काळात होत नाही, एक सामाजिक विचार घेवून त्यांनी आपले वृत्तपत्रे चालवली. त्यांचा वाचकवर्ग  सुद्धा सीमित होता, परंतु त्यांच्या विचाराने एक जनांदोलन उभे केले. साधा मिठाचा सत्याग्रहाचे उदाहरण घ्या, साधे मीठ उचलून महात्मा गांधीजींनी देशभरात स्वातंत्राचे आंदोलन पेटविले. अगदी साध्या साध्या लढ्यातून नवचैतन्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या महापुरुषांनी केलेला आहे. सध्याच्या चालवली मात्र पेड कार्यकर्त्यांवर चालतात. पैसे देवून सभेला लोक बोलवावी लागतात. यावरून नेत्यांची लायकी लक्षात यावी. शिवाजी महाराजांच्या पदरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात मावळे नव्हते, मोजक्याच पण जिगरबाज मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली.हे उदाहरण लक्षात घेतले कि समजते, आपल्या समाजालाही फार मोठ्या परिवर्तन आणणाऱ्या लोकांची गरज नाही. मोजकेच पण तत्वनिष्ठ माणसांच्या पुढाकाराने समाजात बदल होऊ शकतात. छोट्यांनी कायम छोट्यांची बाजू घ्यावी, शोशितांनी  कायम शोषितांची बाजू घ्यावी आणि कामगारांनी कायम कामगारांची बाजू घ्यावी कारण छोट्यांच्या मदतीला मोठे येणार नाहीत, शोषितांच्या मदतीला शोषक येणार नाहीत आणि कामगारांच्या मदतीला कुणीही भांडवलदार येणार नाही, तेव्हा आपल्या मर्यादा, आपली गरजा ओळखून पिडीतांनी संघटीत होणे गरजेचे आहे अस मला वाटत. सध्याची नवीन पिढी ही उत्साही आहे,नवनिर्मितीची आस धरणारी आहे परंतु त्यांच्या निर्मितीशक्तीला योग्य दिशेने नेले तरच आपल्या देशाचे भविष्य अबाधित राहणार आहे. सध्याच्या प्रस्थापित माध्यमांमध्ये भरपूर तरुण येऊ पाहत आहेत. एक व्यवसाय म्हणून माध्यमांकडे आता पाहू लागले आहेत.तरीही तरुण पत्रकारांचे व्यवहारज्ञान कमी दिसते. सामाजिक चळवळीचा गंध नसलेले, सामाजिक जाणीवा नसलेले पत्रकार  समाजमन ओळखू शकत नाहीत. समाजाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठ माध्यमे विसरत चालल्यामुळे समाजाचाही माध्यमावरील  विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. लोकांची सामुहिक निराशा होणारा हा काळ आहे. अशाही काळात, नवपत्रकारांनी थोड्या जरी सामाजिक जाणीवा जागृत ठेवल्या तर पुन्हा माध्यमांची विश्वासार्ह्यता परत  येऊ शकते.आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असली म्हणजे विचारांमध्ये मतभेद होत नाहीत. बातम्या करताना, १० पैकी १ बातमी पिडीताच्या बाजूने लिहिली तरी भरपूर  आहे.माध्यमांसाठी ही बातमी कॉलमभर असली तरी पिडीतासाठी ही बातमी आयुष्य ठरू शकते. येणाऱ्या पिढीकडून हीच अपेक्षा आहे. आहे त्या आव्हानाला तोंड दिले तरच आपल अस्तित्व टिकून राहणार आहे."नागरिक" मधेही परिस्थिती ही नायिका आहे असे मी मानतो, परिस्थितीनुसार घटना घडतात, पण त्या कशा घडवायच्या हे आपल्या हातात असते हे विसरता कामा नये. सध्या "क्रमशः - पुढे चालू" हे मी लिहिलेले दीर्घांक रंगभूमीवर आले आहे, श्री. संदीप रामचंद्र जंगम यांनी त्याची निर्मिती केली आहे. लेखकाच्या जीवनावर अधारिक हे नाटक आहे, त्याचे ५ प्रयोग झाले असून, सध्या या दिर्घांकावर फोकस आहे. जाणीवा जागृत राहिल्या म्हणजे नव्या कलाकृती घडतच असतात.