जन आंदोलनातील हिंसा आणि संघाचा परस्परसंबंध

 २६ जानेवारीला दिल्लीत झालेला राडा आपण सर्वांनी पाहिला. गेल्या ५०-६० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन केले. निगरगट्ट सरकार मात्र त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. २६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर यात्रा काढतील अस जाहीर झाल्यांनतर आशा होती कि सरकार या यात्रेला परवानगी देणार नाही. परंतु घडलं अगदी उलट. सरकारने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर यात्रेला परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांसोबत सामान्य नागरिक देखील आश्चर्यचकित होते. ही खेळी खेळण्यामागे सरकारची मनीषा काय होती हे काल स्पष्ट झालं. 

पोलिसांकडून आखून देण्यात आलेल्या रस्त्यावरून शेतकऱ्यांनी त्यांची ट्रॅक्टर यात्रा सुरु केली. यात देशभरातून शेतकरी आपापल्या परीने सामील झाले होते. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे येथून लोकसंघर्ष मोर्चाच्या आंदोलकांच नेतृत्व प्रतिभाताई शिंदे करत होत्या. ट्रॅक्टरवर जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांची वेशभूषा केलेल्या शेतकरी माय-माऊल्या दिसत होत्या. तिकडे दिल्लीत काय घडतंय याचे अपडेट्स प्रतिभाताई शिंदे, योगेंद्र यादव यांच्या मेसेजवरून कळत होते. 

महाराष्ट्राची झलक दाखवणारी 'किसान गणतंत्र परेड'  

एकीकडे सगळ काही सुरळीत असताना अचानकपणे शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, पोलिसांशी झडप अशा बातम्या येऊ लागल्या. गेला महिने-दोन महिने संयम बाळगून असलेले शेतकरी इतकं आततायी कसं वागू शकतात हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. कुणी एक तरुण लाल किल्ल्यावर जातो काय, तिथे झेंडा फडकवतो काय आणि स्वतःच हसं करून घेतो काय, हे सगळ समजण्यापलीकडे होत. 



परंतु काही तासांत त्या युवकाची ओळख पटली. लाल किल्ल्याच्या एका पोलवर शिख धर्मियांच निशाण साहिब फडकावणारा व्यक्ती होता दीप सिद्धू. हा एक नवखा अभिनेता असून भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सनी देओल यांच्या प्रचाराची  धुरा हाच सांभाळत होता. सुरुवातीला आंदोलनात आल्यानंतर त्याने आंदोलनाचे वातावरण बिघडवण्याचे काम सुरू केल. आंदोलनात तो खलिस्तानवादी भाषणं द्यायला लागला.आंदोलनाच्या संयोजकांनी त्याला वेळीच थांबवलं. 

परंतु शेतकऱ्यांच हेआंदोलन बदनाम करण्याचा चंग बांधलेल्या दीपने ट्रॅक्टर यात्रेत घुसखोरी केली आणि जाणीवपूर्वक लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याची छायाचित्रेही प्रकाशित झालेली आहेत. यावरून दीप सिद्धूचा आणि भाजपचा परस्परसंबंध तुमच्या लक्षात आला असेल. 

Deep Siddhu with Narendra Modi

मा. प्रधानमंत्री आणि दीप सिद्धू, खा. सनी देओल 

असंवेदनशील राज्यकर्ते जर सत्तेत असतील तर विरोधकांची मते ऐकली जात नाहीच पण सोबतच त्यांना वाट्टेल त्या मार्गाने नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. शाहीन बाग आंदोलनात गुंजा कपूर नावाची एक आरएसएसची कार्यकर्ती बुरखा घालून शामिल झाली होती. या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावताना तिला इतर आंदोलकांनी पकडल होत. तिचं पुढ काय झालं? 

शाहीनबागेतच महिला आंदोलाकांवर गोळीबार करू पाहणाऱ्या कपिल गुर्जरची  भाजप,आरएसएसशी जवळीक जगजाहीर आहे. 

जामिया विद्यापीठातील आंदोलकांवर गोळ्या झाडणारा गोपाल देखील उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा कार्यकर्ता राहिलेला आहे. अराजक तत्वे सामजिक आंदोलनात सोडून आंदोलन हाणून पडण्याचा डाव खुद्द सरकार दरबारी आणि मंत्र्यांच्या सांगण्यावरून होत असल्याचं आता स्पष्ट झालय. 


शाहीनबागेत गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश झाला आहे. 

यापुढे आंदोलनात कोण कोण सहभागी होत आहेत आणि कुठल्या विचारधारेचे आहेत हे तपासून घ्याव लागणार आहे.

 सत्तेने मस्तवाल झालेले राज्यकर्ते आता कुठल्याही थराला जाऊ शकतात हे कालच्या घटनेने आपल्याला कळून चुकलंय. 


 

स्वातंत्र्याचा सनातनी गाळ






स्वातंत्र्याच्या डोहात 

डुबकी लावणाऱ्या प्रत्येकाला आज करावा लागतोय सामना,

तळाशी असलेल्या सनातनी गाळाचा!


हा गाळ खेचत असतो तुमचे-आमचे  पाय

आणि जाणीव करून देत असतो आपल्याच पुरातन,विखारी रुढींची!


हा गाळ घेतोय जीव रोहित वेमुलाचा,

डेल्टा मेघवालचा, नजीबचासुद्धा!

विचारवंतांवर गोळ्या झाडून बंदुका फेकल्या जातायेत याच गाळात.

झुंडबळी घेऊन आलेला जमाव सूर्याला देतो अर्घ्य याच डोहात उतरून. 

हा गाळ दिवसेंदिवस बनत चाललाय अक्राळविक्राळ, 

हिटलरच्या नाझीवादासारखा, नमरुदच्या आततायीपणासारखा!


हा गाळ साफ करू पाहणाऱ्या प्रज्ञावंताना  दाखवला जातोय तुरुंगाचा रस्ता,

आणि पहारेकऱ्यांना विचारले जातायेत त्यांच्या नागरिकत्वाचे पुरावे!


मायबाप शेतकऱ्यांना देखील या तळ्याच्या काठाशी विश्रांती घेण्याची सवलत नाही. 

प्रवासी कामगारांना इथे घोटभर पाणी देखील मिळू शकत नाही,

तुम्ही-आम्ही  कुणीच सांगू शकत नाहीये हक्क या डोहावर! 


स्वातंत्र्य ही तर केवळ मनाची अवस्था ना? 

वाटलं तर स्वंतत्र नाही तर गुलाम!

मनावरचा हा गाळ देखील उपसावा लागेल. 

डोहाच्या काठावर असलेल्या लोकांनाही आता डोहात उतरावं लागेल,

गाळात अडकलेल्या स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि सामाजिक न्याय 

या मूल्यांना बरबाद होण्याआधीच वर काढावं लागेल!


चला, सुरुवात करताय ना? 

हा सनातनी गाळ उपसायला?

याच डोहाच्या तळाशी  'आनंदी तरंग' घेऊन तुकोबा उभा आहे, 

आपल्या विद्रोहाच्या पोथ्या घेऊन! 


- सागर भालेराव 

मो. ९९६७०५५६३०

मुकनायकाच्या शब्दाला धार येईल ग...

आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागला. या निकालात लढाऊ तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून आल्याचं आशावादी चित्र तर आहेच. सोबतच जळगावच्या भादली बुद्रुक गावातून अंजली पाटील ही तृतीयपंथीय उमेदवार देखील निवडून आलीये. अंजलीचं निवडून येणं हे अनेकार्थाने महाराष्ट्राच्या जनतेला समजून घ्यावं लागेल. प्रत्येक नवनिर्मितीमागे संघर्ष हा असतोच. याच संघर्षातून अंजलीला देखील जावं लागलं. 



निवडणूक अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज नाकारला होता.  तिने स्त्री राखीव वार्डातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. आपली ओळख 'तृतीयपंथी' सांगणाऱ्या अंजलीला मात्र जुन्या कायद्याच्या आधारे या राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवल गेलं. ज्यांच्या हाती प्रशासकीय सत्ता आहे त्यांनाच जर नवीन कायदे माहिती नसतील तर मनस्ताप हा सामान्य नागरिकांनाच होत असतो हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अंजलीच्या बाबतीतही तेच झालं. तिसऱ्या महिला आयोगाने महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांना सवलती दिल्या जाव्यात असा निर्वाळा केला होता. तसेच २०१९ च्या कायद्यानुसार कुठलीही सज्ञान व्यक्ती आपले लिंग निश्चित करू शकतो/शकते हे ही सरकारी अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं. अशावेळी अंजलीची मैत्रीण, समलैंगिक हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती शामिभा पाटील ही तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सरळ औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत कायद्याचे दाखले न्यायपिठासमोर सादर केले. न्यायालयात मानवी हक्काची लढाई अंजली जिंकली. तिचा अर्ज वैध ठरवला गेला आणि तिला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.

भादलीचे ग्रामस्थ अंजलीची ही चिकाटी न्याहाळत होते. विकासाच्या गप्पा केवळ दाढीची लांबी आणि छातीची रुंदी बघून होत नसते हे त्यांना चांगलच ठाऊक होत. अंजली आरोग्य, शिक्षण, समानता या मुद्द्यावर प्रचार करत होती. लोकांनी तिची तळमळ ओळखली. खोटेपणाचा आलाप जसा कर्कश भासतो तसाच खरेपणा सोन्यासारखा चकाकत असतो. अंजली आणि शामिभा या दोघीही वंचित बहुजन आघाडीचं काम करतात. ऍड.प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही निवडणूक लढवली होती. वंचित समूह घटकांना अजूनही मानवी हक्कांसाठी लढावं लागतं आणि जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हे अनेकांनी पाहिलंय. जातीपातीच्या भिंतींना आता कुठे हादरे बसू लागले आहेत. लिंगाधारित समतेवर, त्यातही समलैगिंकतेवर बोलणं अजूनही पाप समजलं जात अशा समाजात अंजलीचं निवडून येणं ही नव्या युगाची नांदी आहे. महाराष्ट्रात विजयी झालेली अंजली ही एकुलती एक तृतीयपंथी उमेदवार आहे. तिचे मनापासून अभिनंदन! 

समतेच्या, समानतेच्या चळवळीत अंजली आणि शामिभा सारख्या लढाऊ कार्यकर्त्यांनी सूत्रे हाती घेतली तर येणारा काळ प्रत्येकासाठी संधीची समानता घेऊन येईल.काल-परवा पर्यंत आपापल्या मुद्द्यावर एकएकटे लढणारे हे जीव संसदीय लोकशाहीत पाऊल ठेऊ मागतायेत, याचाच अर्थ मुकनायकाच्या शब्दाची धार येत्या काळात आणखी वाढणार आहे.