संवेदना बधिर होत चाललेल्या वर्तमानाची कहाणी-नागरिक

माझा जन्म झाला तो मुळात कोकणातल्या एक छोट्या गावात. नोकरी निमित्ताने आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मुंबई गाठली. मुंबई जशी सगळ्यांना सामावून घेते, तशीच या मुंबापुरीने मला सामावून घेण्यातही कुठलीही अस्पृश्यता पाळली नाही. सुरुवातील पत्रकार म्हणूनच मी आपल्या करियरला सुरुवात केली. पत्रकारितेत आल्यावर वरवर दिसणाऱ्या गोष्टी या किती खोलवर असतात हे समजायला लागलं. १९९३ साली जाहलेली दंगल स्वतः अनुभवली, स्वतःच्या डोळ्यादेखत माणस मरताना आणि मारताना पाहिली. जोगेश्वरीची राधाबाई चाळ  धगधगत्या आगीत माणस कवेत घेताना पाहिली. घाटकोपरची रमाबाई आंबेडकर कॉलनी देखील अशीच आक्रोश करत धगधगताना पाहिली. गिरणी कामगारांचे मोठेमोठे मोर्चे आंदोलन पाहिली आणि त्यांना दडपू बघणाऱ्या मोठ्यामोठ्या शक्ती देखील बघितल्या. ह्या शक्ती कधी निव्वळ  राजकीय होत्या, तर कधी भांडवदारी व्यवस्था आपल्या वळचणीला बांधून ठेवलेले  समाजकारणी यात होत्या. दंगल रेग्युलेट करणारी माणस पहिल्यांदाच पाहत होतो. खर तर दंगल पेटवायची कधी आणि शांत कधी करायची, किती दिवस धगधगती ठेवायची  याच मेक्यानिजम असत हे पहिल्यांदा कळाल. दंगलीच शास्रशुद्ध काम राजकारणी माणसे कशी करतात याच भयाण वास्तव देखील जाणवलं. सामाजिक रंग बेरंग करण्यासाठी राजकारणी माणसे कोणत्या थराला पोहचू शकतात आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी सामान्य नागरिकांचे किती शोषण करू शकतात हे प्रत्यक्ष पाहत होतो, अनुभवत होतो. अनुभवातून, आकलनातून आणि जाणिवांच्या प्रवासातून मग एक कलाकृती डोक्यात घरघर करत होती, आणि ही कलाकृती २००३  साली पहिल्यांदा  अक्षर दिवाळी अंकात छापून आली, तिचे नाव म्हणजे माझी पाहिली वाहिली कादंबरी "नागरिक"!
मी काही कादंबरीकार नाही किंवा बडा लेखक वैगेरे नाही. अनुभवातून जे जे काही आल ते उतरविण्याचा प्रयत्न मी या कादंबरीत केला आहे. एका मराठवाड्यातील  दलित कुटुंबातून आलेला शाम जगदाळे हा तत्वनिष्ठ पत्रकार आपली तत्वे जपत,सामाजिक भावना जागृत ठेवत मुंबईत पत्रकारिता करत असतो. पत्रकारिता करत असताना त्याला राजकारणी, माध्यमे, भांडवलदार हे सगळे आपल्या फायद्यासाठी सामान्य नागरिकाचा कसा बळी घेतात हे जाणवते. शाम जगदाळेला बऱ्याच वेळा आमिषेही  दाखवली जातात, परंतु तत्वाशी तडजोड न करणारा शाम या आमिषाला बळी पडत नाही आणि प्रसंगी नोकरीवर लाथही मारतो. समाजात बदल घडवू पाहणारी आंदोलने बघतो आणि ही आंदोलने मोडीत काढणारी व्यवस्थाही बघतो, बुवाबाजी-नरबळी प्रकारही बघतो आणि त्यांना शरण जाणारे धर्मांधही बघतो. जातीपातीच्या आधारावर राजकारण करणारी बडी मंडळी, आणि त्यांचे लागेबांधे असणारे व्यावसायिक यांच्यात शाम वावरतो. समाजातला हा संघर्ष पाहुन शाम हतबल होत नाही तर नव्या उमेदीने स्वतःचे दैनिक चालू करतो आणि आपला लढा चालूच ठेवतो. असे या कादंबरीचे एकूण कथानक आहे.२००३ साली अक्षर दिवाळी अंकात याबद्दल छापून आल्यानंतर मला पहिल्यांदा माझा मित्र कवी आणि अभिनेता सौमित्र याचा फोन आला.  तो कुठे तरी नाशिकच्या आसपास आपल्या चित्रपटाच शुटींग करण्यात व्यस्त होता.त्याने सुचवले कि ही कादंबरी प्रकाशित कर. इतर मित्रांचाही आग्रह वाढल्यावर २००६ साली डिम्पल पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली. एव्हाना या कादंबरीची भरपूर चर्चा व्हायला लागली.कादंबरी प्रकाशित व्हायच्या अगोदरच सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या. मुळात ही  कादंबरीच मला नवी असल्याने, सिनेमाबद्दल कुठला विचारही नव्हता. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांनी, निर्मात्यांनी संपर्क केला. परंतु, मी काही तयार नव्हतो. त्याच दरम्यान अमेरिकेत असलेल्या जयप्रद देसाई या तरुण दिग्दर्शकाला "नागरिक" ही कादंबरी वाचण्यात आली. २००८ मध्ये त्याने कादंबरी वाचल्यावाचल्या लागलीच मला ई-मेल पाठवला     आणि या कादंबरीवर आधारित सिनेमा काढण्याचा विचार असल्याचे सांगितले. जयप्रद देसाई आणि माझी याअगोदर काही ओळख नव्हती, त्याने अगोदर शोर्ट फिल्म केलेल्या होत्या एवढाच काय तो त्याचा अनुभव होता. नागरिक ही कादंबरी सामाजिक-राजकीय आशयावर असल्यामुळे जयप्रद सारखा नवखा दिग्दर्शक हे उत्तमरीत्या करेल कि नाही अशी धाकधूक होती. जयप्रद देसाईने सांगितले कि तुम्ही जर सिनेमा करण्यास उत्सुक असाल तर मी अमेरिका सोडतो. माझ्या कादंबरीवर सिनेमा काढण्यासाठी एक मुलगा अमेरिका सोडून भारतात येण्याचा विचार करतो आहे याचे मलाही नवल वाटले. ही सगळी प्रक्रिया चालू असतानाच २००९ साली निर्माते सचिन चव्हाण यांनी मला या कादंबरीवर आधारित असलेल्या सिनेमासाठी साईन केलं, आणि सरतेशेवटी "नागरिक" बनवण्यासाठी जयप्रद भारतात आला. २००९ ते २०१४ आम्ही चित्रपटाच्या पटकथेवर आणि संवादावर काम केले. चित्रपटाचे सगळे संवाद मी स्वतः लिहिलेले आहेत. यात लिहिलेले संवाद हे काही हवेतून आलेले नाहीत, आपण रोज बोलतो असे संवाद आहे.सहज आहेत म्हणून ते तीव्र आहेत.त्यामुळेच या चित्रपटाच्या संवादाला उत्कृष्ट संवादाचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळू शकला.लेखक समाजाभिमुक जर असला तर त्याच प्रतिबिंब हे त्याच्या लिखाणात पडत असत.माझही असच झाल, सामाजिक जाणीव घेवून घडलो असल्याकारणाने समाजाच नितळ प्रतिबिंब दाखविण्यास मी यशस्वी ठरलो. संवेदना बधिर होत चाललेल्या वर्तमानाची ही कहाणी आहे तसाच हा  सिनेमा भविष्यावरही भाष्य करतो. काळ आपल्या हातातून निसटतो आहे. जाताना आपल्या हाती अनुभव मात्र देवून जातो. देशातल्या प्रत्येक नागरिकाला इथल्या घटनेने काही अधिकार आणि कर्तव्ये दिलेली आहेत. आपले अधिकार आपण उपभोगत असताना आपल्याकडून अपेक्षित असलेली कर्तव्ये पार पडली जातात कि नाही याची दखल आपण घेतली पाहिजे. घटनेने दिलेले अधिकार आणि हक्क ज्या प्रकारे एका सामान्य नागरिकाला असतात तशीच ती एका पत्रकारालाही असतात. लोकशाहीचा चौथा खांब अशी बिरुदावली मिरवीत असलेला पत्रकार हा देखील एक नागरिकच आहे हे विसरता कामा नये. परंतु सध्याच्या काळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, पत्रकार आता लोकशाहीचा चौथा काय, कुठलाही खांब राहिलेला नाही. सामान्य नागरिकांच्या सगळ्या अपेक्षा माध्यमांनी धुळीस मिळविल्या आहेत. असे असले तरीही मूल्याधिष्ठित समाजरचनेची स्वप्ने बघणारी आणि तत्वनिष्ठ असलेली शाम जगदाळे सारखी पत्रकार मंडळी आपल्या समाजात आजही आहेत हे नाकारूनही चालणार नाही. आजपर्यंतचा सामान्य नागरिकांचा समज होता कि वृत्तपत्रांचे संपादक हे गुणवत्तेवर निवडले जातात, परंतु वास्तव असे आहे कि सद्यकाळात संपादक हे गुणवत्तेवर निवडले न जाता, राजकारण्यांच्या शिफारशीने भरली जातात. जरुरीपुरती निर्भीडता आजच्या सर्वच आघाडीच्या वृत्तपत्रांच्या संपादकानामध्ये पाहायला मिळते, असे माझे परखड मत आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने कादंबरीचीही भरपूर चर्चा झाली. काही लोक या चित्रपटाची तुलना "सिंहासन" या चित्रपटाशीही करतात.पण हे समजून घ्यायला हवे कि या दोन संपूर्ण वेगवेगळ्या कलाकृती आहेत आणि वेगवेगळ्या संदर्भासहित आहेत. सिंहासनमध्ये निळु फुले यांनी साकारलेला पत्रकार हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी नाही, त्यात सत्ता ही केंद्रस्थानी दाखवलेली आहे. परंतु, नागरिक या चित्रपटात संपूर्ण कथानक हे पत्रकार असलेल्या शाम जगदाळे भोवती फिरते. त्यामुळे या चित्रपटाची तुलना इतर चित्रपटांशी केल्यास ती 'नागरिक" वर अन्याय ठरेल.
सध्याची माध्यमांची स्थिती पाहता सामान्य नागरिकांनी मोठ्या हितसंबंध जपणाऱ्या माध्यमांना नाकारून छोट्या छोट्या वृत्तपत्रांना बळ द्यायला हवे. आताच्या काळात नवनिर्मितीसाठी ही छोटीछोटी माध्यमे उपयोगी पडतील. गांधी-फुले-आगरकर-आंबेडकर यांनी चालविलेली पत्रकारिता आताच्या काळात होत नाही, एक सामाजिक विचार घेवून त्यांनी आपले वृत्तपत्रे चालवली. त्यांचा वाचकवर्ग  सुद्धा सीमित होता, परंतु त्यांच्या विचाराने एक जनांदोलन उभे केले. साधा मिठाचा सत्याग्रहाचे उदाहरण घ्या, साधे मीठ उचलून महात्मा गांधीजींनी देशभरात स्वातंत्राचे आंदोलन पेटविले. अगदी साध्या साध्या लढ्यातून नवचैतन्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या महापुरुषांनी केलेला आहे. सध्याच्या चालवली मात्र पेड कार्यकर्त्यांवर चालतात. पैसे देवून सभेला लोक बोलवावी लागतात. यावरून नेत्यांची लायकी लक्षात यावी. शिवाजी महाराजांच्या पदरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात मावळे नव्हते, मोजक्याच पण जिगरबाज मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली.हे उदाहरण लक्षात घेतले कि समजते, आपल्या समाजालाही फार मोठ्या परिवर्तन आणणाऱ्या लोकांची गरज नाही. मोजकेच पण तत्वनिष्ठ माणसांच्या पुढाकाराने समाजात बदल होऊ शकतात. छोट्यांनी कायम छोट्यांची बाजू घ्यावी, शोशितांनी  कायम शोषितांची बाजू घ्यावी आणि कामगारांनी कायम कामगारांची बाजू घ्यावी कारण छोट्यांच्या मदतीला मोठे येणार नाहीत, शोषितांच्या मदतीला शोषक येणार नाहीत आणि कामगारांच्या मदतीला कुणीही भांडवलदार येणार नाही, तेव्हा आपल्या मर्यादा, आपली गरजा ओळखून पिडीतांनी संघटीत होणे गरजेचे आहे अस मला वाटत. सध्याची नवीन पिढी ही उत्साही आहे,नवनिर्मितीची आस धरणारी आहे परंतु त्यांच्या निर्मितीशक्तीला योग्य दिशेने नेले तरच आपल्या देशाचे भविष्य अबाधित राहणार आहे. सध्याच्या प्रस्थापित माध्यमांमध्ये भरपूर तरुण येऊ पाहत आहेत. एक व्यवसाय म्हणून माध्यमांकडे आता पाहू लागले आहेत.तरीही तरुण पत्रकारांचे व्यवहारज्ञान कमी दिसते. सामाजिक चळवळीचा गंध नसलेले, सामाजिक जाणीवा नसलेले पत्रकार  समाजमन ओळखू शकत नाहीत. समाजाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठ माध्यमे विसरत चालल्यामुळे समाजाचाही माध्यमावरील  विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. लोकांची सामुहिक निराशा होणारा हा काळ आहे. अशाही काळात, नवपत्रकारांनी थोड्या जरी सामाजिक जाणीवा जागृत ठेवल्या तर पुन्हा माध्यमांची विश्वासार्ह्यता परत  येऊ शकते.आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असली म्हणजे विचारांमध्ये मतभेद होत नाहीत. बातम्या करताना, १० पैकी १ बातमी पिडीताच्या बाजूने लिहिली तरी भरपूर  आहे.माध्यमांसाठी ही बातमी कॉलमभर असली तरी पिडीतासाठी ही बातमी आयुष्य ठरू शकते. येणाऱ्या पिढीकडून हीच अपेक्षा आहे. आहे त्या आव्हानाला तोंड दिले तरच आपल अस्तित्व टिकून राहणार आहे."नागरिक" मधेही परिस्थिती ही नायिका आहे असे मी मानतो, परिस्थितीनुसार घटना घडतात, पण त्या कशा घडवायच्या हे आपल्या हातात असते हे विसरता कामा नये. सध्या "क्रमशः - पुढे चालू" हे मी लिहिलेले दीर्घांक रंगभूमीवर आले आहे, श्री. संदीप रामचंद्र जंगम यांनी त्याची निर्मिती केली आहे. लेखकाच्या जीवनावर अधारिक हे नाटक आहे, त्याचे ५ प्रयोग झाले असून, सध्या या दिर्घांकावर फोकस आहे. जाणीवा जागृत राहिल्या म्हणजे नव्या कलाकृती घडतच असतात.

No comments:

Post a Comment