भीम लढाया शिकवतो...



६ डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर लाखो भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दाखल होतात. १ डिसेंबरपासूनच चैत्यभूमी परिसरात लोकांची गजबज बघायला मिळते. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो बांधव त्यांच्या उद्धारकर्त्या महामानवाला भेटण्यासाठी इथे येत असतात. इथे विचारांचा जागर असतो. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती, बाबासाहेबांना देवाप्रमाणे आदर देतो. देव म्हणजे आहे तरी काय? देवाला कुणी पाहिलंय का? देव नावाची संकल्पना व्यक्तिपरत्वे,विचारपरत्वे बदलत असते.इथे तर बाबासाहेबच एक विचार आहे. जो विचार मानवमुक्तीकडे घेऊन जातो. माणसाला माणूपण देतो.

सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, वैचारिक वारसा देऊन, अनंतकाळाचं संचित सोडून  गेलेला देवमाणूस म्हणजे बाबासाहेब ! बाबासाहेबांना इथे कुठलेही गंडे-दोरे, अंगारे-धुपारे अर्पण करत नाहीत. बाबासाहेब काही नवसाला पावत नाही,त्यांचा काही कोप होत नाही,अशा गोष्टी घडण्याचा देखील येथे सुतराम संबंध नाही. गेली काही वर्षे दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला जात असतो. प्रत्येकवेळी येथे नवे अनुभव भेटतात. येथे नव्याने बाबासाहेब भेटतात,नव्याने बाबासाहेब कळतात.




यादिवशी चैत्यभूमी परिसर निरीक्षण करण्यासारखा असतो. वेगळ्या वेगळ्या प्रांतातले,राज्यातले लोक इथे पाहायला मिळतात.प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे. जात मात्र समान! प्रेरणा मात्र समान, ती म्हणजे बाबासाहेब!
सगळ्यांना येथे एकत्र आणणारी ऊर्जा म्हणजे बाबासाहेब!
ही ऊर्जा सगळ्यांना एकसंघ बांधून ठेवते.इथे कुणीही कुणाशी प्रांतावरून,भाषेवरून भांडत नाही. एकोप्याने आपले सुखदुःख येथे वाटून घेतले जातात.
चैत्यभूमीवर फिरताना एक गृहस्थ भेटले. रामकुमार बर्मा अरजत असं त्यांचं संपूर्ण नाव. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील रतवार या छोट्याश्या गावातून हा माणूस आला होता.शेतमजुरी करणारे रामकुमार दरवर्षी दादरला येतात.गेल्या २५ वर्षांपासून त्यांची प्रत्येक महापरिनिर्वाणदिनाला हजेरी असते. बिहारच्या 'सोशीत समाज दल' या लेनिन जगदेव प्रसाद यांच्या संघटनेत त्यांना काम केलं. त्यांची हत्या झाल्यानंतर बिहारच्या समाजवादी चळवळीत उलथापालथ झाली.त्यांनतर रामकुमार यांनी या संघटनेचं सक्रिय काम सोडून दिल. त्यानंतर आजतागायत आपल्या गावात शिक्षणासंबंधी जनजागृतीचं काम हा माणूस करतो आहे.

दस का शासन नब्बे पर,
नहीं चलेगा, नहीं चलेगा.
सौ में नब्बे शोषित है,
नब्बे भाग हमारा है.
धन-धरती और राजपाट में,
नब्बे भाग हमारा है.

   अशा घोषणा रामकुमार सांगत होते. ९०% बहुजनांवर १०% अभिजनांनी काय म्हणून आपली मते लादावीत? आपल्या प्रश्नावर आपण स्वतः लढलं पाहिजे असं हा माणूस सांगत होता. त्यांच्या बोलण्यात विद्रोह शब्दाशब्दाला जाणवत होता.  स्वतः केवळ पाचवी शिकलेला हा माणूस आपल्या मुलांनी-नातवंडांनी डॉक्टर व्हव, वकीव व्हावं,उच्चशिक्षित व्हावं,बाबासाहेब व्हावं म्हणून झटतो आहे. त्यांच्या रतवार गावात केवळ आठवीपर्यंत शाळा आहे. पुढचे शिक्षण घेण्याची सोय नसल्यामुळे इथे शिक्षणगळतीचे प्रमाण अधिक असल्याचं ते सांगत होते. बाबासाहेबांनी सांगितलेला 'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश रामकुमार तंतोतंत पळतायेत.

रामकुमार बर्मा अरजत

'दो दो बातें,मोटी मोटी
सबको चाहिये,इज्जत रोटी'

असं सांगत ते म्हणतात कि, आम्हाला काही संपत्तीची आस नाही.आम्ही श्रीमंत व्हावं,गाडी बंगल्यात फिरावं असं काही आमचं ध्येय नाही.आम्हाला केवळ माणूस म्हणून इज्जत हवी आहे आणि पोटाला भाकर हवी आहे. या दोन गोष्टी तेव्हाच मिळतील जेव्हा संपूर्ण समाज शिक्षित होईल,साक्षर होईल. शिक्षणाचं राष्ट्रीयीकरण झालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. 'राष्ट्रपती हो या गरीब कि संतान,सबको शिक्षा एक समान' हे लोहियांचं तत्व अंमलात आणलं पाहिजे अशी रामप्रसाद जोरदार मागणी करतात. सरकारी शाळांमध्ये दिल जाणार शिक्षण आणि खाजगी शाळांमध्ये दिले  जाणारे  शिक्षण सामान असले पाहिजे, शिक्षणात समानता असेल तर समाजात समानता येईल असं त्यांचं म्हणणं होत.

त्यांच्या सगळ्याच गोष्टी पटल्या. इथे ते केवळ दलित वर्गासाठीच बोलत नाहीत तर सर्वांगीण समाजासाठी बोलतात. शिक्षानीतीवर त्यांनी उपस्थित केलेली नाराजी कुणालाही अपील होईल अशीच आहे. या माणसाच्या बोलण्यात आंबेडकरवादाचा प्रभाव जाणवला. केवळ पाचवी शिकलेला या माणसाला एवढी समज आली कुठून? स्वतः शिक्षित नसलेला हा माणूस आपल्या गावातील प्रत्येक मूल शिकावं म्हणून किती धडपड करतोय. ही दृष्टी आहे बाबासाहेब आंबेडकरांची. जी तुम्हाला जागृत करते ,विज्ञानवादी बनवते,चौकस बनवते.


सध्याच्या दलित राजकारणावर देखील ते टीका करतात. रामविलास पासवान यांच्याबद्दल ते प्रचंड नाराजी व्यक्त करतात. ते म्हणतात कि जेव्हा रामविलास पासवान राजकारणात आले,तेव्हा दलितांचे नेते म्हणून मिरवण्यासाठी आणि दलितांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी त्यांनी नारा दिला होता कि,
'उस घर मैं दिया जलांना है, जिस घर मैं अंधेरा छाया है!' आज तेच  पासवान भाजप सोबत सत्तेत गेलेत. ते विचारतात कि भाजपच्या घरात कुठला अंधार होता कि रामविलास पासवान यांनी तेथे दिवा लावण्यासाठी जावं लागलं?
या सगळ्यांची  समाधानकारक उत्तरे रामविलास पासवान-रामदास आठवले-उदीतराज यांना सुद्धा देता येणार नाहीत.
चौफेर विचार करणारा रामकुमार बर्मा अरजत हा त्या विवेकवादी आंबेडकरी चळवळीचं प्रतीक आहे, जो प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी तो तुम्हाला मार्गस्थ करतो. भीमसूर्याची प्रेरणा यामागे असते. इतकं सहजासहजी हे घडत नसत.


याच चैत्यभूमीवर भेटलेला दुसरा माणूस म्हणजे मन्नूलाल. मन्नूलाल हे मध्य प्रदेशमधील अशोकनगर येथून आले होते. त्यांच्या गावातील २४-२५ लोकांनी मिळून १ डिसेंबरला चैत्यभूमीवर येण्यासाठी आपलं गाव सोडलं. ३ तारखेपासून ते शिवाजीपार्कात मुक्कामी आहेत. त्यांना विचारलं कि,इतक्या लांबून प्रवास करून येताना भीती नाही वाटत? त्यांचं उत्तर होत, बाबासाहेब ज्या दिवशी जन्माला आले त्याचदिवशी होती नव्हती ती सगळी भीती संपली. 
मन्नूलाल हे चर्मकार समाजातील आहे. गेल्या २० वर्षांपासून आपल्या  कुटुंबासह ते  चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सोबत त्यांचा २०-२५ वर्षाचा मुलगा देखील आला होता. त्याच नववी पर्यंत शिक्षण झालंय. पुढे  गरिबीमुळं शिक्षणाची संधी मिळाली नाही म्हणून शिक्षण अपूर्ण राहील हे तो खेदानं सांगत होता. चैत्यभूमीवरून काय घेऊन जाता आपल्या गावी? असं विचारल्यावर मन्नूलाल आणि त्याच्या मुलगा उत्तर होत, पुस्तकं !

मध्यप्रदेशहून आलेला मन्नूलाल,आंबेडकरी चळवळ  जिवंत ठेवणारा एक भीमसैनिक 

किती ही सजगता! केवढी मोठी ही क्रांती! ज्यांना शिक्षणापासून आजवर वंचित ठेवलं गेलं तो समाज आज कितीतरी पुढारलेला विचार करतो आहे. त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आजदेखील संपलेले नाहीत. उपरेपणाचं जीवन ते आजही जगतायेत. पण अशाही परिस्थितीत बाबासाहेबांचं तत्व जगणारे मन्नूलाल आणि रामकुमार यांच्यासारखे लोक बाबासाहेबांची चळवळ टिकून ठेवून आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची ताकद त्यांना हत्तीचं बळ देते.बाबासाहेबांची चळवळ ही सत्ताखोर पुढाऱ्यांमुळे जरी लयाला गेली  असली तरी  मन्नूलाल आणि रामकुमार यांच्यासारख्या भीमसैनिकांमुळे ती आजही तग धरून आहे. अशी माणसे चळवळीचा आधार आहेत.जोपर्यंत अशी  लोक आहेत तो पर्यंत समतेची गाथा अखंडपणे सुरु राहील. भीम केवळ तुम्हाला आधार देत नाही, तर तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुम्हाला विचारी बनवतो.तुम्हाला संघर्ष करायला शिकवतो,तुम्हाला लढायला शिकवतो.

मन्नूलाल आणि रामकुमारसारखी असंख्य मंडळी मला अजून भेटायची आहेत.पुढच्या वर्षी जेव्हा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर जाईल तेव्हा खात्री आहे कि अशा लोकांमुळे पुन्हा नव्याने बाबासाहेब कळतील...

-सागर भालेराव 



   












No comments:

Post a Comment