अस्पृश्य लोकशाही

उत्तर प्रदेशात सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे. उत्तर प्रदेश हा भारतातील सत्तेच्या राजकारणातला महत्वाचा भाग. इथे जो कोणी आपलं अस्तित्व,आपली शक्ती दाखवतो त्याला  राष्ट्रीय राजकारणात महत्वाचं स्थान आपसूकच मिळत. इथली दलित मत कायम निर्णायक ठरतात.इथं कांशीराम यांनी केलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग देशभर गाजला. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मायावतीजी सत्तेवर आल्या. एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा. इथे समाजवादी विचाराचा देखील तेवढाच प्रभाव. सत्तेत किंवा विरोधी पक्षात बसपा आणि समाजवादी पार्टी अदलून बदलून बसलेले आहेत. इथे सगळ्यांना लोकशाहीवादी समाज घडवायचा आहे. सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर प्रातःस्मरणीय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर बाबासाहेबांचं केव्हाच अपहरण केलंय. ही झाली पार्श्वभूमी. आता मुद्य्यांकडॆ वळूया.

उत्तर प्रदेशमधील  हाथरस जिल्ह्यातील इगलास या विधानसभा क्षेत्रात भाजप पक्षाने राजवीर दिलेर यांना उमेदवारी दिली आहे. राजवीर दिलेर हे वाल्मिकी समाजाचे आहेत.हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने ही उमेदवारी त्यांना  दिली गेली आहे हे वेगळे सांगण्याचे कारण नाही.

हा मतदारसंघ कायम भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पुढची गोष्ट आणखी  महत्वाची, हे राजवीर दिलेर जेव्हा प्रचारासाठी उच्चवर्णीय लोकांकडे जातात, तेव्हा चक्क आपल्यासोबत स्टीलचा चहासाठीचा पेला सोबत ठेवतात. लोक त्यांना त्यातच पाणी आणि चहा देतात.ते लोकांच्या घराबाहेरच  ओसरीवर बसून मतांची भीक मागतात आणि लोक देखील त्यांना 'दलित' म्हणूनच वागणूक देतात. आणखी महत्वाची गोष्ट ही कि, राजवीर दिलेर यांचे वडील याच मतदारसंघातून ५ वेळा आमदार आणि १ वेळा खासदार राहिलेले आहेत.आता आपली लोकशाही सामाजिक न्यायाच्या दिशेने किती जोरदार घौडदौड करते आहे याचा तुम्हाला अंदाज आलेला असेलच.



अस्पृश्य लोकशाहीच हे ढळढळीत उदाहरण.इथे लोकच नाही तर लोकशाही देखील अस्पृश्य आहे.ज्या अमित शहांनी राजवीर दिलेर यांना उमेदवारी दिली , तेच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये सवर्ण-दलित भाईचारासाठी आयोजित 'सह-भोजन' कार्यक्रमासाठी सामील झाले होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून  केवळ ३०० किमी अंतरावर असलेल्या इगलास येथे   त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांशी अजूनही अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो ही मोठ्या शरमेची गोष्ट आहे.  या मतदारसंघात एकूण ९०,००० जाट समुदायाची मते आहेत.लौकिकार्थाने हे सवर्ण. तेव्हा अस्पृश्यांनी सवर्ण समुदायाला इज्जत देणे हा तर धर्माचा आदेश!

विद्रोहाचा वारसा महाराष्ट्रातील महार समाजाला जसा मिळाला तसा उत्तर प्रदेशातील वाल्मिक समाजाला मिळालेला अजून तरी दिसत नाही. आपल्या दलितपणातच ते खुश आहेत. ५ वेळा आमदारकी  आणि १ वेळा खासदारकी  मिरवलेल्या कुटुंबातील  व्यक्तीला जर अजूनही अस्पृश्यतेची वागणूक तिथला समाज देत असेल आणि तो व्यक्ती देखील ती वागणूक सन्मानाने स्वीकारत असेल तर नेमका दोष द्यायचा कुणाला? मतांसाठी लोकांच्या पाय पडताना हा उमेदवार म्हणतो की , 'मला तर गावाचा चौकीदार बनायचं आहे, आमदार नाही' .

पत्रकारांनी विचारल तर तो सांगतो, 'मी एका भंग्याचा मुलगा आहे,माझे वडील देखील तेच काम करत होते आणि मी देखील तेच काम करतो. मी माझी मान-मर्यादा संपवू शकत नाही. जग बदलत असेल, पण मी स्वतःला बदलू शकत नाही'.

या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, धर्मसत्ता किती पद्धतशीर काम करत असते. लोकशाही व्यवस्था स्वीकारून आपल्याला ७० वर्षे होत आली तरीही आपण आपली जाती परंपरा सोडायला तयार नाहीत. या परंपरा डोक्यात इतक्या भिनल्या आहेत की शोषण करणारे आणि शोषित दोघेही त्याला सोडायला तयार नाहीत. ईश्वरी योजना म्हणून या दुरमानवी परंपरा मोठ्या अदबीनं अजूनही पाळल्या जातात.
काही दिवसात निवडणूक होतील, त्यांचे निकाल  लागतील. राजवीर दिलेर जिंकतीलही.विधानसभेत जातील. पुढे काय?
ज्या आरक्षित जागेवरून ते निवडून जातील त्या पदाला ते काय न्याय देतील? सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जो व्यापक अर्थ आरक्षणाच्या मागे आहे तो यातून साध्य होईल का? किंवा कायम आरक्षणाच्या नावाने गळे काढणारे सो कोल्ड पांढरपेशे ही व्यवस्था समजून घेतील काय आणि त्यात सुधारणा आणण्यासाठी काही कार्यक्रम आखतील काय? या सगळ्या शक्यता धूसरच. जातव्यवस्था संपली असं बोलायला किती सोपं वाटत,संविधानातील कलम १७ द्वारे ही अस्पृश्यता  नष्ट झाली (केवळ कागदावर) असं सांगितलंय पण त्याच अस्तित्व असं कुठे नजरेस पडलं तर सरळ कानाडोळा केला जातो. यावर राष्ट्रीय चर्चा घडून येत नाहीत.किंबहुना त्या घडू नयेत म्हणून तसे प्रयत्न देखील केले जातात. हे सगळं राजरोसपणे आपल्या डोळ्यासमोर घडत आहे. या सगळ्यांना आपण सगळे जबाबदार आहोत. राजवीर दिलेरला दोष देऊन फायदा नाही. तो मूर्खच! पण गुलामाला गुलामीची जाणीव करून दयावी लागेलच. आज ना उद्या ते होईल. पण वेळ मात्र गेलेली असेल.

असंगघोष या  प्रसिद्ध कवीच्या ओळी यानिमित्ताने आठवतायेत,

होय, 
आता माझं शीर
कलम केलं जाईल,
परंतु,
मी हुजरेगिरीला 
नाकारतो आहे. 

राजवीर दिलेरला शुभेच्छा तरी कोणत्या तोंडाने देऊ?

-सागर भालेराव (प्रतिनिधी.लोकमुद्रा मासिक)


No comments:

Post a Comment