स्वातंत्र्याचा सनातनी गाळ






स्वातंत्र्याच्या डोहात 

डुबकी लावणाऱ्या प्रत्येकाला आज करावा लागतोय सामना,

तळाशी असलेल्या सनातनी गाळाचा!


हा गाळ खेचत असतो तुमचे-आमचे  पाय

आणि जाणीव करून देत असतो आपल्याच पुरातन,विखारी रुढींची!


हा गाळ घेतोय जीव रोहित वेमुलाचा,

डेल्टा मेघवालचा, नजीबचासुद्धा!

विचारवंतांवर गोळ्या झाडून बंदुका फेकल्या जातायेत याच गाळात.

झुंडबळी घेऊन आलेला जमाव सूर्याला देतो अर्घ्य याच डोहात उतरून. 

हा गाळ दिवसेंदिवस बनत चाललाय अक्राळविक्राळ, 

हिटलरच्या नाझीवादासारखा, नमरुदच्या आततायीपणासारखा!


हा गाळ साफ करू पाहणाऱ्या प्रज्ञावंताना  दाखवला जातोय तुरुंगाचा रस्ता,

आणि पहारेकऱ्यांना विचारले जातायेत त्यांच्या नागरिकत्वाचे पुरावे!


मायबाप शेतकऱ्यांना देखील या तळ्याच्या काठाशी विश्रांती घेण्याची सवलत नाही. 

प्रवासी कामगारांना इथे घोटभर पाणी देखील मिळू शकत नाही,

तुम्ही-आम्ही  कुणीच सांगू शकत नाहीये हक्क या डोहावर! 


स्वातंत्र्य ही तर केवळ मनाची अवस्था ना? 

वाटलं तर स्वंतत्र नाही तर गुलाम!

मनावरचा हा गाळ देखील उपसावा लागेल. 

डोहाच्या काठावर असलेल्या लोकांनाही आता डोहात उतरावं लागेल,

गाळात अडकलेल्या स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि सामाजिक न्याय 

या मूल्यांना बरबाद होण्याआधीच वर काढावं लागेल!


चला, सुरुवात करताय ना? 

हा सनातनी गाळ उपसायला?

याच डोहाच्या तळाशी  'आनंदी तरंग' घेऊन तुकोबा उभा आहे, 

आपल्या विद्रोहाच्या पोथ्या घेऊन! 


- सागर भालेराव 

मो. ९९६७०५५६३०

No comments:

Post a Comment