तशाही 'कुतिया' प्रामाणिकपणे फार खतरनाक असतात: महिला दिन विशेष


'संघर्षातून निर्मिती' हे आशयपूर्ण सूत्र घेऊन राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकारातून महाराष्ट्र सोशल फोरम चा प्रयोग होतो आहे. त्यासाठी आपणा सर्वांचे अभिनंदन.अलीकडच्या काळात माणूस म्हणून जगण्याचा, आनंद अनुभवायचा अवकाश कोरोना आणि कोरोनाबाह्य कारणांमुळे अतिशय भयानक रीतीने आक्रसत जातो आहे. या निमित्ताने महाराष्ट्र सोशल फोरमचा हा वैचारिक हस्तक्षेपाचा यज्ञ मला अधिक स्वागतार्ह वाटतो आहे. याच जागरात माझ्यासारख्या लिहित्या व्यक्तीला आमंत्रित केलं गेलं, यासाठी आयोजकांचे आभार.


मला इथे हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अनामिका हिची आठवण होते आहे. ती एका कवितेत असं म्हणते,


मैं एक दरवाजा थी

मुझे जितना पीटा गया

मैं उतनी ही खुलती गई!


याचा अर्थ काय आहे तर, अविरत संघर्ष ही बाब स्त्रियांसाठी अजिबात नवीन नाही. संघर्षरत स्त्रीला, प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीला, उत्तर मागणाऱ्या स्त्रीला, परंपरेने लादलेली स्त्री संहिता गपगुमान न स्वीकारता स्वप्रज्ञाने अर्थ लावते म्हणून, त्याची मोडतोड करते म्हणून आणि नवनवीन संहिता आणू पाहते म्हणून सगळ्याच स्त्रिया पिटल्या जात आहेत. पिटल्या  जाणाऱ्या या स्त्रिया थांबायला मात्र तयार नाहीत. अनामिका म्हणते तशी ही संघर्षरत स्त्री सताड उघड्या दरवाजासारखी बनत चालली आहे. ऍड. निशाताई शिवूरकर म्हणतात तसं प्रज्ञा, शील आणि निर्भयता या गोष्टी स्त्रियांनी अंगी बाणल्या पाहिजे. बऱ्याच वर्षांपासून स्त्रियांचा स्व-अस्मितेचा संघर्ष सुरू आहे. हा कुठलाही संघर्ष तिच्यासाठी कधीच साधासोपा नव्हता. बुद्ध काळात थेरीगाथेत बौद्ध स्त्रियांनी पितृसत्तेला प्रश्न विचारले आहेत. त्यात एक स्त्री असे म्हणते की, माझा नवरा मला सतत मारहाण करतो, तेव्हा अशा नवऱ्यासोबत मी का रहाव?  इतकंच नाही तर विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला सत्य स्वरूपात बघण्याची जी संकल्पना बौद्ध तत्त्वज्ञानाने सांगितली आहे, त्या जागृत अवस्थेला अंगीकृत करण्याची ताकत ही बौद्ध काळात थेरींनी अवगत केलेली आपल्याला आढळते. ज्ञान प्रक्रियेतील ज्ञान अर्जित करण्याचा अधिकार अडीच हजार वर्षांपूर्वीही महिलांनी बजावला होता हे यातून स्पष्ट होते. अर्थात हे सगळं सहजासहजी घडलेले नाही. संत जनाबाईंनी स्वतःला 'वेसवा' म्हणजेच वेश्या म्हणवून घेत, सामाजिक अवकाशात पाऊल टाकलं. चोखोबांची पत्नी, सोयराबाईंनी तर वर्णव्यवस्थेत असलेल्या 'विटाळ' संकल्पनेतील कोतेपणा अतिशय निर्भयपणे उघड केला आहे.


 देहासी विटाळ म्हणती सकळ 

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध 

देहीचा विटाळ देहीच जन्मला 

सोवळा तो झाला कवण धर्म? 

अशा धारदार शब्दात सोयराबाई आपले विचार मांडताना दिसतात. अशाच प्रकारे दक्षिणेत अक्कमहादेवी,  कश्मीर मधल्या लल्लनदेवी, उत्तरेतील संत मीराबाई अशांसारख्या अनेक क्रांतिकारक स्त्रियांनी आपले विचार निर्भयपणे मांडले आहेत. अलीकडच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर नेटफलिक्स वर 'बुलबुल' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाची निर्माती अभिनेत्री अनुष्का शर्मा ही आहे. या चित्रपटातून असं दिसतं की स्त्रियांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या संघर्षाचा सामना केला आहे. स्त्रियांना 'पापाची खाण' म्हटलं गेलं, तर कधी 'बुलबुल' सारखं उलट्या पायांची डाकीण म्हटलं गेलं. अलीकडच्या सत्ताधार्‍यांना तर तिचं हसणं देखील शूर्पणखेची आठवण करून देत. खरं पाहायला गेलं तर आमच्यासारख्या सर्व स्त्रियांसाठी शूर्पणखा ही एक लढावू स्त्री आहे. अलीकडच्या काळात भेदक प्रश्न विचारणाऱ्या या आमच्या महिला पत्रकार मैत्रिणींना 'प्रेस्टीट्यूट' अशी विशेषण लावली गेली आहेत. पुरस्कार परत करणाऱ्या माझ्यासारख्या लिहित्या स्त्रीला पाकिस्तानचे हस्तक असंही म्हटलं गेलं आहे. मी हे याचसाठी सांगते आहे की काळ कुठलाही असू देत स्त्रियांचे ट्रोलिंग होतच आलेले  आहे.  पंडिता रमाबाईंची 'रेवरंडा' म्हणून रेवडी उठवणारे लोकमान्य टिळक देखील एका अर्थाने पंडिता रमाबाईना ट्रोलच करत होते. गौरी लंकेश सारख्या निर्भीड महिला पत्रकाराला सनातनी गोळ्या घालून आज ठार मारतात. मधल्या काळात सावित्रीबाई फुले, फातिमाबी,मुक्ता मांग ,ताराबाई शिंदे असे भरभक्कम खांब आपली प्रेरणा म्हणून उभे राहतात. या खांबांना धरूनच आजच्या स्त्रिया अन्यायाच्या विरोधात निडरपणे आवाज उठवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून लोकशाहीचा संकोच ज्या पद्धतीने होतो आहे, दमनशाहीचे स्तोम माजवले जात आहे अशा परिस्थितीत आपण सगळे लढतो आहोत. परंतु या सगळ्या परिस्थितीचा सामना स्त्रिया अनादिकालापासून करत आहेत. जन्म घेतलेल्या घरापासून ते बाहेरच्या जगापर्यंत याला कुठेही अपवाद नाही.


हे खरं आहे की आज स्त्रिया खूप शिकतायेत, आपले प्रश्न मांडत आहेत, न्याय हक्कासाठी भांडत आहेत, नवऱ्याच्या दमनाला विरोध करत आहेत, घटस्पोट घेत आहेत आणि  एकट्या राहून समष्टीसाठी लढत आहेत. चिपको आंदोलनापासून ते 'मी टू' आंदोलनापर्यंत आपल्याला हेच बघायला मिळतं.खरं तर सध्या आपल्या सर्वांचा उलटा प्रवास सुरू आहे. लोकशाहीतून हुकूमशाहीकडे आपण निघालो आहोत. आजवर अविरत संघर्षातून स्त्रियांनी मिळवलेला जो अवकाश आहे तोच अवकाश हिरावून घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. मोदी सरकार सातत्याने 'नव्या भारताची' भाषा करत आहे. नव्याची चलती सुरू असताना या शासनाचा नाविन्याचा सोस स्त्रियांपर्यंत येता येता पूर्णपणे आटून गेलेला दिसतो. त्यांच्यालेखी असलेली आदर्श स्त्रीची प्रतिमा ही अजूनही जुनाट आहे. हिंदु राष्ट्रात स्त्रीने किती मुले जन्माला घालावी हे सांगणारी त्यांची संस्कृती आहे. स्त्रियांसाठी कुटुंब हेच प्रधान कार्यक्षेत्र मानणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीचे वेगळेपण असं की, इथे सरकार आदर्श सांगून थांबत नाही तर त्या आदर्शांच्या आधारावर 'चांगली स्त्री' आणि 'वाईट स्त्री' असं विभाजन देखील केल जात. त्यांच्या लेखी असलेल्या 'वाईट स्त्रियांना' कठोर शासन देऊन योग्य मार्गावर आणण्याची देखील व्यवस्था आहे. यासाठी साम-दाम-दंड-भेद या सत्तादंडाचा  मुक्तहस्ताने वापर केला जातो. अशा स्त्रियांवर हिंसेचा वापर देखील केला जातो. सरकारी यंत्रणा देखील त्याला अधिमान्यता देतात. जामिया मिलिया विद्यापीठ असो किंवा बनारस हिंदू विश्वविद्यालय असो तरुण मुलींना दंडुक्याच्या धाक दाखवून योग्य मार्गावर आणू पाहिलं गेलं. योगी सरकार मध्ये बलात्कारित महिलांचा संघर्ष किती निष्ठूरतेने मोडून काढला गेला हे आपण पाहिलं. बलात्कारित पुरुषांना संरक्षण देण्याचा देखील प्रकार घडला. आजच्या वर्तमानाचे वेगळेपण यानिमित्ताने आपल्याला स्पष्ट दिसते आहे.

अनामिका ही कवयत्री तिच्या दुसऱ्या एका कवितेत म्हणते,


स्त्री सब कुछ जानती है पिंजरे के बारे में

जाल के बारे में, यातनागृह के बारे में

उसे पूछो पिंजरे के बारे में

वह बताती है निले अनंत विस्तार के बारे में

उड़ने के रोमांच के बारे में


कारावासाच्या भिंती उध्वस्त करून मुक्तीचा स्वप्न बघणारी जी स्त्री आहे ती सनातनी वृत्तीच्या लोकांसाठी आदर्श कशी असणार? 'बेटी बचाव बेटी पढाव' अशी घोषणा देणारे जे सत्ताधारी आहेत, त्या सत्ताधाऱ्यांना पुरुष सत्तेचे समर्थक म्हणून ती स्वतःची जबाबदारी भासू लागते.परंतु जिला संरक्षण द्यायचे आहे तीच जर लढायला तयार असेल तर तिचा बंदोबस्त केला पाहिजे हे देखील ते पुरुषसत्तेची जबाबदारी मानतात. हे सगळं आपण आपल्या सर्व भोवतालात अनुभवतो आहोत. केरळ मधील शबरीमाला प्रकरण ,नागरिकत्व विधेयक आदी निमित्ताने स्त्रियांचा झगडा आपण पाहिला. प्रत्येक वेळी सरकारने त्यांना सापत्न वागणूक दिली आहे. अलीकडच्या काळातील शाहीनबागचा लढा हा आपल्याला स्वातंत्र्य आंदोलनाची आठवण करून देणारा होता. दिल्लीतल्या फक्त शंभर स्त्रिया शाहीनबागेत एकत्र येतात आणि धरणे धरतात. त्यांच्या भूमिकेचा स्वीकार करून देशभरात शाहीनबाग उभारल्या गेल्या हे सकारात्मक चित्र आहे  शाहीनबागेच्या महिला आंदोलकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शीख धर्मीयांनी घेतली हे देखील आपण पाहिले आहे. हे सगळे घडत असताना स्वतःला निधर्मी, लोकशाहीवादी म्हणून घेत असलेला आम आदमी पक्ष शाहीन बाग आंदोलकांना भाजपच्या कुटील कारस्थानाचा भाग ठरवतो ही देखील अत्यंत उद्वेग आणणारी घटना होती. दिल्लीत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका लक्षात घेता या धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा भाजपाने साधून घेतलेला दिसतो. शाहीनबागेतील काही लोक भाजपमध्ये सामील झालेही असतील, परंतु सरळपणे आपण तिथल्या आंदोलकांना भाजप समर्थक म्हणत असू, तर कुठेतरी आपण या महिलांनाच बेदखल करतो आहोत. महिलांना बेदखल करून आपण आपली लढाई लढू शकत नाही. फॅसिजम विरोधी लढाईची धुरा ही महिलांच्या खांद्यावर असणार आहे हे शाहीनबाग आंदोलनाने आपल्याला दाखवलं. भारतीय स्त्री मग ती प्रियंका भोतमांगे असू देत किंवा सफुरा सरगर असू देत, राधिका वेमुला असू देत किंवा गौरी लंकेश असू देत, लढण्याचा खूप मोठा अनुभव आणि वारसा भारतीय स्त्रियांना आहे. भारतीय संविधानाच्या तळपत्या सर्व मूल्यांसाठी हाच लढाईचा वारसा आपल्याला उपयोगी ठरणार आहे असं मला वाटतं. समारोप करताना मला एक कविता तुमच्या समोर सादर करावीशी वाटते, 'मी वाचू पाहिलं सत्य'



मी वाचू पाहिलं सत्य

वाचू पाहिली सत्याची पारदर्शी झुळझुळीत अक्षर

ज्याला घाबरला तुम्ही आणि वेगानं बदलवत नेलं त्यांना 

कधीच न बदलणाऱ्या पोथ्यांमध्ये 

तुम्ही घाबरलात लहान मुलांच्या उत्फुल्ल हसण्याला

शाळकरी मुलींच्या तुर्रेबाज लाल रिबीनीनां

घाबरलात तुम्ही तरुण तरतरीत मेंदूना

ज्यात उसळतात लाखो-करोडो प्रश्न 

एखाद्या मंथर कारंजासारखे थुईथुई

तुम्ही देता नागव्या तलवारी, छरेदार बंदुक्या

लाठ्याकाठ्या, कोयते आणि हिंसेचा आकर्षक पासवर्ड.

जे रोखू शकणार नाही त्यांची पावलं

मी नाही सोडणार धीर, विझणार नाहीत माझी स्वप्न कधी पुन्हा पुन्हा उतरेन मी 

कधी अक्कमहादेवीच्या दाहक शरीरातून

कधी गौरी लंकेच्या तीक्ष्ण धारदार लेखणीतून

पुन्हा पुन्हा दिसेल मी कुठल्याही गल्लीबोळात 

तशाही 'कुतिया' प्रामाणिकपणे फार खतरनाक असतात.


-डॉ. प्रज्ञा पवार 

(महाराष्ट्र सोशल फोरम आयोजित 'स्त्री आणि नव्या युगातील संघर्ष' या परिसंवादातील त्यांनी मांडलेले हे विचार आहेत) 


आभार: Rashtra Seva Dal, India YouTube Chanel 

No comments:

Post a Comment