तेरे कातील जिंदा है..दाभोळकर हम शरमिंदा है..!!!

दाभोळकर सरांना एक अनाहूत पत्र.......



प्रिय नरेंद्र दाभोळकर सर ......

             आज तुम्हाला हे पत्र लिहिताना कोठून सुरुवात करावी.काय लिहू,कसं लिहू अशा असंख्य प्रश्नांनी मनात अगाध गोंधळ घातलाय.तुम्हाला आमच्यातून जाऊन पुरत एक वर्ष सरलंय ! चालता बोलता तुम्ही आमच्यातून निघून गेलात.आयुष्यभर विज्ञानवादी दृष्टीने जगलेल्या तुम्हाला ही पुरोगामी तरुण पिढी कशी विसरू शकेल.धर्माची,श्रद्धेची,कर्मकांडाची विज्ञानवादी चिकित्सा करण्याची दृष्टी तुम्हीच तर आम्हाला दिली.त्याच  हत्तीच्या बळामुळे आम्ही सनातनांच्या तोंडात चपराक मारू शकलो.तुमचा नरबळी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने "जादूटोणा  विधेयक" अध्यादेश काढून लागू केला.पण त्यासाठी तुमचा नरबळी द्यावा लागला .....आणि त्यानंतर तुम्हाला "पद्मश्री" देऊन तुमच कौतुकही करण्यात आले. तुम्ही लावलेलं प्रबोधनाच रोपट  आता हळूहळू वाढत आहे,त्याचाच परिपाक म्हणून आता पंढरपूरचा विठ्ठल बडवेमुक्त तर झालाच पण आता त्याची पूजा सोवळे घातलेल्या शेटजी भटजींच्या नव्हे तर,बहुजन समाजातील पुजाऱ्यांच्या हातून होत आहे.तुम्हाला अभिप्रेत असलेली प्रबोधनाची चळवळ संथ गतीने का होईना पण आम्ही पुढे चालवत आहोत.

          तुमचे मारेकरी तर खरे षंढ म्हणावे लागतील.विचारांची लढाई विचारांनी करायची असते हे समजण्या इतके ते शहाणे न याअगोदर होते अन भविष्यातही होतील कि नाही याची शाश्वती नाही.आता तर अशा गांडूच्या अवलादी गल्ली पासून दिल्ली पर्यंत,रस्त्यारस्त्यावर दिसत आहेत.आज पर्यंत छुपी लढाई करणारे हे धर्माचे ठेकेदार समोरासमोर लढण्यासाठी तयार आहेत.काळ कसोटीचा आहे पण तुमच्या मुशीत वाढलेले आम्ही खचलेलो नाही.सल मात्र एवढी आहे कि आमचं ढिम्म प्रशासन तुमच्या मारेकऱ्यांना पकडू शकलं नाही.तुमचे मारेकरी आज खुशाल रानमोकळे पणाने  हिंडतायेत.आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असे विखारी प्रकार घडत असताना त्याला खतपाणी घालणारे कोण होते आणि कुणाच्या सांगण्यावरून तुमचा खून पाडला गेला हे कळण्याइतके मूर्ख इथले राजकारणी तर मुळीच नाहीत.आणि हद्द म्हणजे तुमचे मारेकरी शोधण्यासाठी जगात  पोलिस प्रशासनाने आजपर्यंत कुठेही वापरली नसेल अशी पद्धत तुमच्या खुनाच्या तपासाधिकारी गुलाबराव पोळ यांनी वापरली.तुमचं तथाकथित भूत "प्लनचिट" करून बोलावलं गेलं आणि त्यालाच मारेकरी कोण असा सवाल केला गेला.तुम्ही जर हयात असता आणि असा प्रकार घडला असता तर तुमची काय प्रतिक्रिया असती हे आम्ही समजू शकतो.आणि यावर कळस म्हणजे आपल्या देशाचे प्रसिध्द शास्रज्ञ,परम संगणकाचे जनक डॉ.विजय भाटकर यांनी तर हा प्रकार म्हणजे तपास प्रक्रियेचा भाग आहे अस सरळ सरळ विज्ञानवादी प्रमाणपत्र देऊ केलं.या प्रकारावरून इथली परिस्थिती  किती भयानक आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल.
         असो,सध्या मुलतत्ववाद्यांची चालती आहे,सांप्रदायिक शक्ती राहून राहून डोक वर काढतायेत.धर्माच्या आड माणूस माणसाला मारतो आहे.काल परवा नितीन आगे आणि मोहसीन शेख यांची हत्या येणाऱ्या काळाची नांदी अधोरेखित करून गेली आहे.रात्र वैऱ्याची आहे आणि दिवससुद्धा वैऱ्याचा आहे.आता राष्ट्रवादाची परिभाषा बदललेली आहे.मुलतत्ववादाला देशभक्तीची झालर लावण्याचा बेगडी प्रयत्न सगळीकडे चालू आहे.अभिव्यक्तीची गळचेपी चालू आहे.इथले आदिवासी-दलित-मूळनिवासी भीतीच्या छायेखाली आहेत.एकात्मतेचे वारे थंडावलेले आहेत.आजपर्यंत काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लिहिला जात होता,आता  मात्र भगव्या शाईने "खाकी" कागदावर इतिहास लिहिला जाणार आहे.अशाही परिस्थितीतही तुमच्या प्रेरणेने आम्ही आशावादी आहोत.
"हे असे आहे तरीही,हे असे असणार नाही.....
दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही......."

धर्माचे गारदी कितीही बळकट असले तरी विवेकाने आम्ही त्यांना तोंड देणार आहोत.आज न उद्या ही परिस्थिती सुधारेल. बदल हा प्रकृतीचा नियम आहे तेव्हा जे काळानुरूप बदलणार नाहीत ते नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही ही तुमची शिकवण आम्ही अंगी बनलेली आहे.तुमच्या जाण्यापाठी वर्षभरात भरपूर गोष्टी घडल्या.पुण्याच्या ओंकारेश्वर पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलंय.आणि त्या वाहणाऱ्या पाण्यात प्रतिगाम्यांच्या जणिवासुध्हा वाहून गेल्यात  ........
असो,भरपूर तक्रारी आणि सल मनात आहे.काही अंशी या पत्रातून ती व्यक्त केलीये.राहिल्या साहिल्या गोष्टी परत एकदा पत्र लिहून कळवेन.....तोपर्यंत रजा घेतो.उद्या तुमच्यासाठी आयोजित स्मृतीसभेला जायची तयारी करायची आहे.तुमच्या पुढच्या स्मृतीसभेच्या वेळी तुमचे मारेकरी पकडले गेले असतील अशी अशा व्यक्त करतो अन थांबतो......जाताना शीतल साठेने तुमच्यावर रचलेल्या गाण्याच्या ओळी तेवढ्या सांगतो..

संपविला देह जरी,संपणार नाही मती......
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली....
तुका मारुनिया त्याची खबर दडवली....
त्या तुकयाच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती....
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

आठवा चार्वाकाला तुम्ही भस्म केले होते...
नाव इतिहासातुनी लुप्त झाले होते.....
त्याच चार्वाकाचे वारसआज दावू किती???
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

                                                                                                              क्रांतिकारी सलाम.

                                                                                                             तुमचा एक कार्यकर्ता 

No comments:

Post a Comment