अन्सार आणि नसीम

वर्ष झालंय या गोष्टीला. मागच्या वर्षी चंद्रपूरला श्रमसंस्कार शिबिराला गेलो होतो. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या प्रेरणेन हे शिबीर अव्याहत चालू आहे. श्रमाला जातीचा, धर्माचा, पंथाचा गंध नसतो अस बाबा म्हणायचे. आपले हात हे कुणाला मारण्यासाठी नाही तर नवनिर्माणासाठी आहे अस बाबा म्हणायचे. 'भारत जोडो' अभियान याच मूल्याचा एक भाग. मागच्या वर्षी विचार केला कि चला या वर्षी श्रमसंस्कार शिबिराला जाऊयात  त्या निमित्ताने परिवर्तन  चळवळीतले मित्रमैत्रिणी भेटतील, नवा विचार ऐकायला, अनुभवायला मिळेल.


     अन्सारची एक विजयी मुद्रा, ज्यामागे बरेच संदर्भ आहेत.


शिबिराला गेलो, नवे मित्रमैत्रिणी भेटले, जुन्या नव्या विषयावर गप्पा व्हायच्या.आमच्या ग्रुपमध्ये एक चिनू नावाचा दहावीत असलेला  मुलगा होता. संघाच्या शाखेत जाणारा. संघाचे पक्के संस्कार त्याच्यावर खोल रुजलेले. मला दादा म्हणून हाक मारायचा. मला जेवताना एकदा त्याने जात विचारली. म्हंटल, 'मी ब्राम्हण आहे '(मी त्याला धर्म सांगितला हे त्याला कळले नाही, त्याचे या उत्तराने समाधान मात्र झाले) . त्याने प्रतिप्रश्न केला कि, 'मग जानवे का नाही घालत? ' म्हटलं 'माझा उपनयन विधी करायला मीच घरच्यांना नकार दिला म्हणून'. भाई बोलला, 'काय दादा तू पण भ्रष्ट ब्राम्हण निघालास!' त्याच्या भ्रष्ट ब्राम्हणांच्या यादीत मी कितवा होतो माहित नाही.
 
दुपारी शेतावर, बंधाऱ्यावर श्रम करून आलो कि मित्र मंडळी जवळच्या ओढ्यावर अंघोळीला जायचे. चिनू देखील मागेमागे असायचा. आमच्या सोबत पुण्याहून आलेला एक मित्र देखील होता. एक दिवशी चिनूने त्याच्याकडून अंघोळीचा साबण मागितला, त्याने दिला. अंघोळीवरून आल्यावर पुण्याच्या मित्राने आणलेला फरसाण खायला सगळे बसलो. त्याने घरून आणलेला फरसाण आम्ही गप्पाटप्पा मारत खात होतो. तितक्यात कोणी मित्र आला आणि 'अरे नसीम, अंघोळीला जाऊन आलास काय?' असा प्रश्न केला. त्याने उत्तर दिल 'हो'. त्या दोघांचे संभाषण चालू असताना, चिनू मात्र फरसाण खायचा थांबला. हातातला घास त्याने तसाच परत ठेवला. आणि 'तू मुस्लिम आहेस ?' अस नसीमला विचारलं, चिनूच्या कपाळावर पडलेल्या घड्या स्पष्ट दिसत होत्या. आता चर्चेला वेगळ वळण लागल. तुझ्याकडे बघून तू मुस्लिम असल्याच वाटत नाही, मुस्लिम लोक कसे क्रूर असतात वैगेरे बोलायला लागला. आम्ही त्याला समजविण्याचा प्रयत्न केला जरूर, पण तो मात्र वेगळ्या अविर्भावात होता. सुरवातीला नसीमने देखील लहान आहे म्हणून दुर्लक्ष केल. चिनू फरसाण न खाता निघून गेला. तो गेल्यावर मात्र २५/२६ वर्षाचा नसीम रडायला लागला. वयाने लहान असलेल्या पोराने माझा, माझ्या धर्मावरून उद्धार करावा हे जस त्याला पटल नव्हत तसच आम्हालाही पटल नव्हत. नसीम सांगायला लागला, हा अनुभव काही आजचा नाही. लहानपणापासून अशा प्रसंगाला समोर गेलोय. शाळेत असताना 'लांड्या' म्हणून चिडवायचे. कॉलेजमध्ये असतानाही इतर मुले मैत्री करायचे नाहीत,कारण एकच, माझा धर्म!
नसीम दाढी ठेवत नव्हता आणि टोपीदेखील घालत नव्हता, तेव्हा त्याची मुस्लिम ओळख स्पष्टपणे दिसायची नाही. त्याची मराठी देखील अस्खलित! मुस्लिमांचे असलेले कुठलेच संस्कार त्याच्या राहणीमानात दिसत नव्हते, किंबहुना ते लपवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. ढसाढसा रडलेला नसीम आज  प्रकर्षाने आठवत आहे तो अन्सार शेखच्या निमित्ताने.

देशभरातून ३६१ क्रमांक घेवून अन्सार युपीएससी पास झालाय. पुण्यात शिकायला असताना तो मुस्लिम असल्याकारणाने त्या रूम मिळायची नाही, तेव्हा आपल नाव तो शुभम सांगायचा. काय रे ते दुर्दैव!
आपली स्वतःची ओळख इथल्या सामाजिक विषमतेमुळे लपवावी लागण म्हणजे कसलं द्योतक? अल्पसंख्यांक असलेल्या वर्गाला आश्वासक वातावरण निर्माण करण्यास आपण पुरते अपुरे पडलो आहोत हे सत्य पुन्हा एकदा समोर आलय.( या अगोदरही पुण्यात मोहसीन शेखची हत्या झाली तेव्हा देखील आपल्याला अशीच उपरती झाली होती)  नसीम काय आणि अन्सार काय दोघेही सामाजिक विषमतेचे बळी ठरलेत. पण दोघांच्याही जिद्दीला सलाम. नसीम पुण्यातच प्राध्यापकाची नोकरी करतो आहे, येणाऱ्या पिढीवर समतेचे संस्कार व्हावेत म्हणून हरएक प्रयत्न करेल असे तो म्हणतोय. अन्सार देखील आता प्रशासकीय सेवेत आलाय. रंजलेल्या गांजलेल्या लोकांची सेवा व्हावी म्हणून त्याने हे क्षेत्र निवडलंय अस तो सांगतो. मी पूर्वग्रह ठेवून लिहितो आहे असा कुणाचा गैरसमज होईलही. पण जे लिहिलंय ते सत्य घटनेतून लिहिलंय. नसीमला ढसाढसा रडावं लागण, अन्सारला आपल नाव लपवावं लागण आणि चिनूला संघाचे संस्कार असण हा काही योगायोग नाही. आपण काय पेरतो आहोत आणि काय उगवलं जात आहे हे  रोहित वेमुला सोबत ओमर खालिद यांच्या उदाहरणाने स्पष्ट व्हाव. 'मला मातृभूमी नाही' अस उद्विग्नपणे बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना उद्देशून म्हटले होते. आज स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही ही म्हणण्याची वेळ कुणावरही येऊ नये. त्यासाठी संघर्ष करावा लागेल, हरएक पातळीवर. समाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयही. नसीम आणि अन्सार सारखे लाखो करोडो भारतीय या संघर्षाचे वाहक व्हावेत. भारताची वाटचाल ही लोकशाही समाजवादाच्या दिशेने व्हावी ना कि हिंदुराष्ट्रच्या दिशेने.

No comments:

Post a Comment