बुरहान वानी काश्मिरी तरुणांचा हिरो का?



बुरहान वानीच्या हत्येनंतर संपूर्ण काश्मिरात आगडोंब उसळला आहे. काश्मीरची जनता बुरहान वानीला आतंकवादी मानायला तयार नाही. त्यांच्यासाठी बुरहान हा 'शहीद' झालेला आहे. कित्येक सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला असेल की, ज्या व्यक्तीला आतंकवादी, दहशतवादी म्हटलं पाहिजे, त्याला शहीद म्हटलं तरी का जात?
प्रत्येकाची आतंकवादाची वेगवेगळी परिभाषा असू शकते. असेलही.माझ्या मते जो व्यक्ती सामाजिक-राजकीय आणि मुख्य म्हणजे धार्मिक फायद्यासाठी निष्पाप लोकांची हत्या करतो त्याला आतंकवादी म्हटलं पाहिजे. मग ते कोणीही असो. गांधीजींची हत्या करणारा नथुराम असू देत किंवा दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांची क्रमाक्रमाने हत्या घडवून आणणारे सनातन संस्थेचे साधक असू देत.केवळ सामाजिक-राजकीय-धार्मिक स्वार्थासाठी या सगळ्यांनी निष्पाप माणसांच्या कत्तली घडवल्या आहेत,विवेकवादाच्या तिलांजली देत.असो, आपली कृती किती योग्य होती यासाठी असल्या आतंकी लोकांकडे वाद-प्रतिवाद असतीलही, परंतु माझ्यालेखी ते दहशतवादीच ! असल्या आतंकवादाचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. बुरहान वानी याच परंपरेतला आहे. लोकशाहीत हिंसा करण्याचा अधिकार केवळ पोलीस आणि आर्मीला दिला गेला आहे. सामाजिक स्थैर्य टिकून राहावं यासाठी समाजहिताला  हानिकारक असलेल्या शक्तींवर हिंसक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असतात. त्याचा गैरफायदा घेणारे देखील नथुरामच्या परंपरेतले आहेत असे बोलल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सध्याच्या मणिपूर प्रकरणात कोर्टाने दिलेले कारवाईचे आदेश याप्रकरणी अधिक बोलके आहे. काही पोलीस लोकसेवेची ओळख असलेली खाकी घालून सेवा करतात, तर काही पोलीस संघी मानसिकता घेऊन 'खाकी' परिधान करतात  आणि त्याचे पर्यावसान म्हणजे  मनोहर कदमच्या हातून रमाबाई नगर हत्याकांड घडते!

बुरहान वानीच्या अंत्ययात्रेला नागरिकांनी गर्दी केली होती

बुरहान वानी हा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता.हिजबुल मुजाहिदीनचा आजवर इतिहास पाहीला तर तो फुटीरतावादाचा राहिलेला आहे. परंतु बुरहान वानी जर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पोलिसांसोबत लढत होता, तर त्याला विद्रोही म्हटलं पाहिजे असा काहीसा काश्मिरी नागरिकांचा सूर आहे. अनेक विदेशी वृत्तपत्रांनी त्याचा उल्लेख 'मिलिटन्ट' अर्थात विद्रोही असाच केलाय.बुरहान वानीच्या बंदुकीने किती लोकांच्या नरडीचा घोट घेतलाय हे मला माहीत नाही, पण केवळ माध्यमे त्याला 'दहशतवादी' ठरवत असेल तर आपण  देखील ते अंध म्हणून कसं स्वीकारायचं? ज्या काश्मिरी लोकांचा हा प्रश्न आहे त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही? काश्मीरच्या लोकांना भारतात राहण्याची अजिबात इच्छा नाही. सरकारला देखील हे पक्के ठाऊक आहे. कुणापासून ही गोष्ट लपलेली नाही, म्हणून तिथे जनमत घ्यायला सरकार घाबरते आहे. काश्मीर हा भारतात आहे तो केवळ सैन्याच्या धाकापोटी. कधी कधी तिथल्या तरुणांची घुसमट बाहेर येते आणि हे तरुण पोलिसांवर दगडफेक करायला लागतात, जसे नक्षलवादी पोलिसांवर वार करतात अगदी तसेच. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश काश्मिरात जनमत घ्यायला तयार नसतो, लोक असंतुष्ट असतात, दगडफेक करतात, सरकारवर अविश्वास दाखवतात. नेमकी ही गोष्ट कुरापतखोर पाकिस्तान ओळखतो,आणि काश्मीर घाटीत आगडोंब कसा कायम राहील यासाठी प्रयत्न करतो.आपण मात्र धुमसत असतो.


बुरहान वानी आता काश्मिरी खोऱ्यातील युवकांचा हिरो बनलाय.


ही घुसमट किती दिवस आपण दाबू शकू? यावर काही तोडगा आपण काढणार आहोत काय? एक तर काश्मिरी तरुणांनी 'सत्याचे प्रयोग' करत अच्छे दिनची वाट पहावी, किंवा माओने सांगितलेल्या मेक्यानिजमचा वापर करत हातात शस्रे घेऊन स्वतःची मुक्तता करावी, अथवा काहीच करू नये.जे काही होतंय ते निमूटपणे सहन करावं.शांतपणे, अविचलपणे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी हातात शस्रे घेणारे काही कमी क्रांतिकारक नव्हते. भगतसिंग,राजगुरू,सुखदेव, सुभाषचंद्र बोस या सगळ्यांनी तो प्रयत्न केला,त्यात ते अयशस्वी ठरले, तरी ते आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी लढलेला लढा हा आपल्यासाठी फायद्याचा होता, अस्मितेचा होता.बुरहान वानी हा देखील काश्मीरच्या लोकांच्या मनात धुमसणाऱ्या प्रश्नासाठी लढणारा एक युवक होता. त्याला तिथले लोक आता शहीद म्हणतील, आपण त्याला काय म्हणायचं ते आपलं आपण ठरवूया. पण बुरहान वानीच्या अंत्ययात्रेला 20 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहतात,त्यात तरुणांचा आणि महिलांचा सहभाग अधिक असतो, ही गोष्ट काही आपल्या पथ्यावर पडणारी नाही. तूर्तास उसळलेला आगडोंब आणखी काही दशके शमणार नाही असे दिसते.



No comments:

Post a Comment